सिंधुदुर्ग,दि. ३०: प्रशासकीय कामकाजात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) प्रणाली प्रभावीपणे राबविणारा देशातील पहिला जिल्हा म्हणून सिंधुदुर्गने ऐतिहासिक मान मिळवला आहे. या महत्त्वपूर्ण उपक्रमाची दखल घेत, केंद्र सरकारच्या नीती आयोगाचे शिष्टमंडळ आजपासून (दि. ३०) दोन दिवसांच्या अभ्यास दौऱ्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाले आहे.

या दौऱ्याच्या निमित्ताने जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी नीती आयोगाच्या सदस्यांचे, डॉ. देवव्रत त्यागी आणि श्रीमती विदिशी दास यांचे, स्वागत केले. यावेळी जिल्हा प्रशासनातर्फे जिल्ह्यात यशस्वीपणे राबविण्यात आलेल्या AI प्रणालीची संपूर्ण माहिती व सादरीकरण आयोगाच्या सदस्यांना देण्यात आले.
या दोन दिवसांत जिल्ह्यातील विविध शासकीय विभागांमध्ये प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत. या भेटीदरम्यान, ‘सिंधुदुर्ग मॉडेल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या AI प्रणालीच्या कार्यप्रणालीचा सखोल अभ्यास केला जाणार आहे.

या अभ्यास दौऱ्याची विशेष बाब म्हणजे, नीती आयोगाकडून तयार करण्यात येणारा अहवाल थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सादर केला जाणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याने कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून शासकीय कामकाज पारदर्शक, जलद आणि नागरिकभिमुख करण्याच्या दिशेने देशात एक नवा आदर्श निर्माण केला आहे. हा तंत्रज्ञानाधारित प्रयोग आता देशभरातील प्रशासनासाठी प्रेरणादायी ठरणार असून, ग्रामीण भागाला ‘AI-सक्षम जिल्हा’ कसे बनवता येईल, या दृष्टीने ‘सिंधुदुर्ग मॉडेल’ महत्त्वाचे ठरणार आहे.




