Home News साटेली येथील बेकायदेशीर मायनिंग उत्खनन तात्काळ थांबवा; ॲड. आल्हाद नाईक यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे...

साटेली येथील बेकायदेशीर मायनिंग उत्खनन तात्काळ थांबवा; ॲड. आल्हाद नाईक यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

0
1

सावंतवाडी,दि.२२: तालुक्यातील साटेली गावात बेकायदेशीर मायनिंग उत्खनन केले जात असून हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. तरी सदरचे उत्खनन थांबवावे अशी मागणी ॲड. आल्हाद नाईक यांनी जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदन देऊन केली आहे.
साटेली गाव हा इकोसेन्सिटिव्ह गावांच्या यादीत समाविष्ट असताना या गावात मायनिंग सारखे प्रदूषणकारी प्रकल्पाच्या गोंडस नावाखाली बेकायदेशीर उत्खनन करून 50 ते 60 फुट खोल कशी खोदाई केली जाते?असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला असल्याचे नाईक यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.साटेली येथे उत्खनन करून ठेवलेल्या मालाची वाहतूक करण्यासाठीच परवानगी दिलेली असताना बेकादेशीरपणे नव्याने उत्खनन करून फार मोठ्या प्रमाणात लोह खनिज उत्खनन केले जात आहे. हे प्रशासनला माहित आहे का आणि माहित असेल तर प्रशासनाने गांधारीची भूमिका घेतली असावी असाही प्रश्न उपस्थित केला आहे.हे उत्खनन करत असताना चुकीच्या पद्धतीने केलेले बेंच, बेकायदेशीर रित्या केलेले उत्खनन यामुळे निर्माण झालेले भले मोठे खड्डे या सर्व कारणांमुळे अनेक वेळा या ठिकाणी अपघातही झालेले आहेत. मोठ्याचे मोठे मातीचे ढीग करून ठेवले असून यामुळे भात शेतीचे नुकसान झाले आहे. साटेली मायनिंग मध्ये भू स्खलन झाल्या संदर्भात 07/08/2025 रोजी जिल्हा खनिकर्म अधिकारी यांनी स्थळ पाहणी केली होती.यावेळी 7 बेंच कोसळले असल्याचे दिसून आले होते.यामुळे 40.37 हेक्टर आर क्षेत्रामध्ये जीवितहानी टाळण्यासाठी लोकखनिज उत्खनन व वाहतूक थांबविण्यात येत असल्याबाबत 12/08/2015 रोजी जिल्हाधिकारी यांनी संबंधित खाण कंपनीला पत्र दिले होते.यामुळे असे असताना माळीणसारखी दरड कोसळून मोठी दुर्घटना झाल्यास त्याला जबाबदार कोण? असाही प्रश्न उपस्थित केला आहे. साटेली गावात सुरू असलेल्या बेकायदेशीर उत्खननामुळे कोणत्या प्रकारची नैसर्गिक आपत्ती निर्माण होऊन त्यात वित्तहानी व प्राणहानी झाल्यानंतर प्रशासन जाग येणार का? असे झाल्यानंतर ज्यांचा जीव जाईल त्यांना जबाबदार कोण? या सर्व प्रश्नांची उत्तरे प्रशासन देईल का? असा निवेदनातून थेट सवाल नाईक यांनी केला आहे. तरी मी निवेदनाद्वारे केलेल्या प्रकारची आपण खातरजमा करून साटेली गावात येऊन आपण प्रत्यक्ष पाहणी करावी आणि पुढे भविष्यात होणारी दुर्घटना टाळावी अशीच नाईक यांनी विनंती करीत आपणाकडून पुढील आठ दिवसात कोणत्या प्रकारची पाहणी व कारवाई न केल्यास नाईक उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. या निवेदनासोबत जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी खाण कंपनीला दिलेले पत्र जोडले आहे. यामुळे जिल्हाधिकारी साटेली मायनिंग बाबत कोणती कारवाई करते याकडे लक्ष राहिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here