Home News शिरशिंगे ग्रामस्थांच्या आक्रमक पावित्र्यानंतर महावितरणाला जाग; आठ दिवसानंतर काही भागात वीज पुरवठा...

शिरशिंगे ग्रामस्थांच्या आक्रमक पावित्र्यानंतर महावितरणाला जाग; आठ दिवसानंतर काही भागात वीज पुरवठा सुरळीत

0
5

कायमस्वरूपी वायरमन देण्याचे उपकार्यकारी अभियंता राक्षे यांचे आश्वासन

सावंतवाडी,दि.०८: गेल्या आठ दिवसांपासून वीज पुरवठा खंडित असल्याने त्रस्त झालेल्या सावंतवाडी तालुक्यातील शिरशिंगे गावातील ग्रामस्थांनी आज अखेर आपल्या संयमाचा बांध तुटल्याने सावंतवाडी येथील महावितरण कार्यालयावर थेट धडक दिली. आठवडाभरापासून गावात वीज नसल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे आणि विशेषतः विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत होते. या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिरशिंगे येथील लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांनी महावितरण कार्यालय गाठून उपकार्यकारी अभियंता श्री. राक्षे यांची भेट घेतली आणि गावातील विदारक परिस्थिती त्यांच्यासमोर मांडली.

ग्रामस्थांच्या या आक्रमक पवित्र्यानंतर उपकार्यकारी अभियंता श्री. राक्षे यांनी केवळ कार्यालयात न बसता स्वतः महावितरणच्या कर्मचाऱ्यांसह तातडीने शिरशिंगे गावात धाव घेतली. वीज पुरवठ्यात अडथळा ठरणाऱ्या वीज तारांवरील झाडांच्या फांद्या तोडण्यासाठी गावातील युवक आणि ग्रामस्थांनीही कर्मचाऱ्यांना मोलाचे सहकार्य केले. सर्वांनी मिळून तातडीने श्रमदान करत झाडे तोडून वीज वाहिनी मोकळी केली आणि काही भागांतील विद्युत पुरवठा सुरळीत केला. ग्रामस्थांच्या या एकजुटीमुळे शिरशिंगे येथील देऊळवाडी, जाधववाडी, राणेवाडी, विरवाडी आणि धोंडवाडी या भागात तब्बल आठ दिवसांनी वीज परतली आहे, तर उर्वरित परबवाडी, मळईवाडी आणि गोठवेवाडी या भागांतील वीज पुरवठा उद्यापर्यंत सुरळीत करण्यात येईल, अशी माहिती उपकार्यकारी अभियंता श्री. राक्षे यांनी दिली.

दरम्यान, ऐन अडचणीच्या काळात शांतता राखत प्रशासनाला सहकार्य केल्याबद्दल उपकार्यकारी अभियंता श्री. राक्षे यांनी शिरशिंगे येथील नागरिकांचे कौतुक केले. ग्रामस्थांनी दाखवलेला संयम आणि वीज तारांवरील झाडे हटवण्यासाठी केलेल्या प्रत्यक्ष मदतीबद्दल त्यांनी संपूर्ण गावाचे आभार मानले. तसेच, भविष्यात अशी समस्या पुन्हा उद्भवू नये म्हणून शिरशिंगे गावात तातडीने कायमस्वरूपी वायरमन नेमण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी ग्रामस्थांना दिले. या प्रसंगी शिरशिंगेचे सरपंच दीपक राऊळ, माजी सरपंच नारायण राऊळ, उपसरपंच सचिन धोंड, माजी उपसरपंच जीवन लाड, सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र भिंगारे, गणपत राणे, सत्यवान परब, रघुनाथ परब, उत्तम शिर्के, अरुण राऊळ, लक्ष्मण राऊळ यांच्यासह वीरवाडी, राणेवाडी, देऊळवाडी आणि शिरशिंगे गावातील बहुसंख्य युवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here