सिंधुदुर्ग जिल्हा अनुसूचित जाती समाज बांधवांचा इशारा; ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होऊनही आरोपी मोकाट असल्याचा आरोप
कणकवली, दि.०८: मुणगे येथे बौद्ध समाजातील एका तरुणाला केवळ त्याची जात विचारून अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी देवगड पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल होऊनही आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पोलीस प्रशासनाने या प्रकरणी तातडीने कारवाई करून आरोपींना गजाआड करावे, अन्यथा देवगड पोलीस ठाण्यावर तीव्र ‘आक्रोश मोर्चा’ काढण्यात येईल, असा इशारा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनुसूचित जाती समाज बांधवांच्या वतीने देण्यात आला आहे. कणकवली येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित एका जाहीर पत्रकार परिषदेत समाज बांधवांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी हा इशारा दिला.
या पत्रकार परिषदेला माजी समाजकल्याण सभापती अंकुश जाधव, चर्मकार समाज उन्नती मंडळाचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र चव्हाण, देवगड तालुका सेवा संघाचे पदाधिकारी आनंद देवगडकर आणि माजी नगरसेवक गौतम खोडकर यांच्यासह महेंद्र चव्हाण, आनंद जाधव, सुंदर जाधव, बाळकृष्ण चव्हाण, विश्वनाथ पडेलकर, देवदत्त कदम, दिलीप वाडेकर, सुभाष कदम, आनंद मोरे, सुशील कदम, विनोद कदम, विनायक तांबे, विनय मोरे, सूर्यकांत मोरे, विनोद मोरे, तुषार जाधव, शरद कांबळे व गौतम हिंदळेकर यांच्यासह जिल्ह्यातील अनुसूचित जाती समाजाचे बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती देताना अंकुश जाधव यांनी सांगितले की, कुडाळ तालुक्यातील कसाल येथील रोहित नारायण कदम हा तरुण मुणगे येथे बॅनर लावण्याचे मजुरीचे काम करत होता. तिथे काम करत असताना काही जणांनी त्याला रस्त्यात अडवले आणि सर्वप्रथम त्याची जात विचारली. त्याने आपली जात सांगताच, संशयितांनी त्याला जातीवाचक शिवीगाळ करत बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. ‘तुम्ही खालच्या जातीचे लोक ही अशीच कामे करणार’ अशा हीन दर्जाच्या शब्दांत त्याचा अपमान करण्यात आला. एवढ्यावरच न थांबता, संशयितांनी आणखी काही लोकांना तिथे बोलावून घेतले आणि पीडित तरुणाला रोजगार म्हणून स्वीकारलेले ते काम न करण्याची दमदाटी केली.
या गंभीर प्रकारामुळे पीडित कदम कुटुंब सध्या प्रचंड भीती आणि दहशतीखाली वावरत आहे. रोजगार म्हणून स्वीकारलेले बॅनर लावण्याचे काम करण्यासही आता ते घाबरत असून, त्यांच्यावर उपासमारीची व बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. या सर्व परिस्थितीला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल जाधव यांनी उपस्थित केला. देवगड पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक (ॲट्रॉसिटी) कायद्यान्वये रीतसर गुन्हा दाखल झाला असतानाही, पोलीस आरोपींना अटक का करत नाहीत, असा सवाल त्यांनी केला. पोलिसांवर कोणताही राजकीय दबाव आहे की त्यांनी स्वतःच असा दबाव निर्माण करून घेतला आहे, याचे उत्तर प्रशासनाने द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. तसेच संशयितांकडून पीडित कुटुंबावर तक्रार मागे घेण्यासाठी सातत्याने दबाव टाकला जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.
आरोपी कोणत्याही जातीचे, पक्षाचे किंवा संघटनेचे असले तरी कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाही नाही, असे ठणकावून सांगत जाधव म्हणाले की, तपासाची प्राथमिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही आरोपींना मोकाट सोडणे अनाकलनीय आहे. या प्रकरणात आवश्यक ती सर्व कडक कलमे लावून दोषींवर कठोर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षकांना देण्यात येणार आहे. जर वेळेत कारवाई झाली नाही, तर समाजाच्या वतीने देवगड पोलीस ठाण्यावर धडक आक्रोश मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. यावेळी पीडित तरुण रोहित कदम यानेही आपली आपबिती मांडली. मजुरीचे काम करत असताना केवळ नाव आणि जात विचारून आपल्याला जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली, मारहाण झाली आणि संशयितांनी आपला मोबाईल फोनही तोडून टाकला, अशी संतापजनक माहिती रोहितने पत्रकार परिषदेत दिली.



