अभाविपच्या जिल्हा अभ्यास वर्गात डिजिटल मीडिया जिल्हाध्यक्षांचे मार्गदर्शन
सावंतवाडी,दि .६ जुलै :“आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियाकडे केवळ मनोरंजनाचे साधन म्हणून न पाहता, त्याकडे रोजगाराची एक उत्तम संधी म्हणून पाहिले पाहिजे. इन्स्टाग्राम, व्हॉट्सॲप यांसारख्या लोकप्रिय माध्यमांचा योग्य वापर करून, रिल्स आणि जाहिरातींच्या माध्यमातून तरुण घरबसल्या हजारो रुपयांचे अर्थार्जन करू शकतात. सोशल मीडिया हे प्रगतीचे एक अतिशय प्रभावी माध्यम असून तरुण पिढीने याचा वापर अत्यंत सकारात्मक, योग्य आणि जबाबदारीने केला पाहिजे,” असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा डिजिटल मीडियाचे जिल्हाध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार अमोल टेंबकर यांनी येथे केले.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) वतीने येथील कळसुलकर हायस्कूलच्या सभागृहात जिल्हा अभ्यास वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या अभ्यास वर्गातील एका सत्रात ‘सोशल मीडिया आणि रोजगाराच्या संधी’ या विषयावर उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर अभाविपचे कोंकण प्रांत सह मंत्री यश कंटक, रत्नागिरी विभाग संघटन मंत्री ओजस जयवंत, जिल्हा संयोजक मयूर तर्पे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलताना श्री. टेंबकर यांनी सोशल मीडियाच्या दोन्ही बाजू विद्यार्थ्यांसमोर स्पष्ट केल्या. ते म्हणाले, “हे माध्यम जेवढे फायदेशीर आहे, तेवढेच त्याचे दुष्परिणामही गंभीर आहेत. योग्य काळजी घेतली नाही, तर सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे तरुण पिढी भरकटण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचे थेट परिणाम वैयक्तिक आयुष्यावर होऊन अनेक चढ-उतार निर्माण होऊ शकतात. म्हणूनच तरुणांनी या माध्यमाच्या आहारी न जाता, यातील आधुनिक तंत्रज्ञान योग्य प्रकारे समजून घेऊन ते स्वतःच्या आर्थिक प्रगतीसाठी आणि कौशल्य विकासासाठी वापरले पाहिजे.”
आजच्या काळातील डिजिटल क्षेत्रातील पत्रकारितेवर प्रकाश टाकताना अमोल टेंबकर यांनी सांगितले की, बदलत्या तंत्रज्ञानामुळे पत्रकारिता क्षेत्रात करिअरच्या आणि रोजगाराच्या अनेक नव्या वाटा खुल्या झाल्या आहेत. युवकांनी या सुवर्णसंधींचा योग्य फायदा उठवून स्वावलंबी होण्याच्या उद्देशाने या क्षेत्राकडे सकारात्मकतेने पाहावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
या जिल्हा अभ्यास वर्गाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमधील बहुसंख्य विद्यार्थी आणि अभाविपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



