Home News शिरशिंगे गावात ‘अंधाराचे साम्राज्य’; महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळे ग्रामस्थ आक्रमक!

शिरशिंगे गावात ‘अंधाराचे साम्राज्य’; महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळे ग्रामस्थ आक्रमक!

0
2

गेले दोन दिवस वीज गुल; कायमस्वरूपी वायरमन देण्याची मागणी

सावंतवाडी,दि.०५: सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या सावंतवाडी तालुक्यातील शिरशिंगे गावात गेल्या दोन दिवसांपासून वीज पुरवठा पूर्णपणे खंडित झाल्याने ग्रामस्थांचे प्रचंड हाल होत आहेत. या गंभीर समस्येबाबत महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना वारंवार कळवूनही त्यांच्याकडून सातत्याने दुर्लक्ष केले जात असल्याचा संतप्त आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे. महावितरणच्या या उदासीन कारभारामुळे संपूर्ण परिसरात तीव्र नाराजीचे वातावरण पसरले आहे.

काही दिवसांपूर्वी शिरशिंगे येथील जाधववाडी भागात विजेचा खांब कोसळला होता. या घटनेनंतर तब्बल आठ दिवस उलटून गेले, तरीही महावितरण प्रशासनाकडून कोणतीही वेगाने हालचाल करण्यात आली नव्हती. वारंवार संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देऊनही दखल घेतली जात नव्हती. अखेर तब्बल आठ दिवसांनंतर प्रशासनाने येथे वीजेचा खांब घातला खरा, परंतु तरीही गेल्या दोन दिवसांपासून वीज गायब असल्याने ग्रामस्थांमधील नाराजी कायम आहे. गेले आठ दिवस सुरू असलेल्या या विजेच्या लपंडावामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत.

सतत खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन पूर्णपणे कोलमडले आहे. घरगुती कामांमध्ये मोठ्या अडचणी निर्माण होत असून, पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. त्यातच वीज नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. रात्रीच्या वेळी अभ्यास कसा करावा, असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर उभा ठाकला आहे.

“सध्या संपूर्ण पंचक्रोशीचा भार केवळ एकाच वायरमनवर टाकण्यात आला आहे. त्यामुळे तक्रार करूनही वेळेत निवारण होत नाही. शिरशिंगे व परिसरासाठी कायमस्वरूपी वायरमनची नियुक्ती करावी, ही आमची जुनी मागणी आहे. निद्रिस्त अवस्थेत असलेल्या या वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना शेवटी कधी जाग येणार?” असा नाराजीचा सूर ग्रामस्थांमधून येत आहे.

शिरशिंगे आणि सभोवतालच्या परिसरासाठी तातडीने कायमस्वरूपी वायरमनची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी पुन्हा एकदा जोरदारपणे लावून धरली आहे. केवळ एका कर्मचाऱ्यावर एवढ्या मोठ्या परिसराची जबाबदारी असल्याने दुरुस्तीच्या कामांना विलंब होत आहे. महावितरणने या समस्येची गंभीर दखल घेऊन तातडीने वीज पुरवठा सुरळीत करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here