Home News पालकमंत्री नितेश राणे यांच्या मागणीनंतर सरकार ‘ॲक्शन मोड’वर; सिंधुदुर्गातील वीज संकटासाठी विशेष...

पालकमंत्री नितेश राणे यांच्या मागणीनंतर सरकार ‘ॲक्शन मोड’वर; सिंधुदुर्गातील वीज संकटासाठी विशेष पथके रवाना!

0
3

सातारा, सांगली, बारामतीतून कामगार दाखल होणार; युद्धपातळीवर वीज पुरवठा सुरळीत करण्याचे आदेश

सिंधुदुर्ग, दि.०९: सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे वीज यंत्रणेचे मोठे नुकसान झाले असून अनेक गावे अंधारात बुडाली आहेत. या गंभीर वीज संकटाची दखल घेत राज्य सरकार पूर्णपणे ‘ॲक्शन मोड’वर आले आहे. सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या मागणीनुसार मुख्यमंत्री कार्यालयाने आज तातडीने बैठक घेतली. या बैठकीत जिल्ह्यातील वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी सांगली, सातारा आणि बारामती या ठिकाणाहून कामगारांची विशेष पथके तातडीने सिंधुदुर्गात रवाना करण्यात आली आहेत. तसेच मोडलेले पोल पुन्हा उभे करण्यासाठी राज्याच्या मेजर स्टोअरमधून आवश्यक ते ट्रान्सफॉर्मर आणि इतर साहित्य पुरविण्याच्या सूचना मुख्यमंत्री कार्यालय व वीज वितरण विभागाचे अप्पर मुख्य सचिव लोकेश चंद्रा यांनी दिल्या आहेत. मुख्यमंत्री कार्यालयाच्या या गतिमान उपाययोजनांमुळे वादळामुळे त्रस्त झालेल्या सिंधुदुर्गवासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.

या संदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाने पालकमंत्री नितेश राणे यांच्या समवेत एक उच्चस्तरीय व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली. या बैठकीला सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे, कोकण मंडळाचे मुख्य अभियंता अनिल डोये आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता अभिमन्यू राख आदी अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे सुमारे ६०० वीज खांब आणि ट्रान्सफॉर्मरचे मोठे नुकसान झाले असून, विशेषतः सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यांना याचा सर्वाधिक फटका बसला आहे. दोडामार्ग तालुक्यातील ६२ गावे बाधित झाली असून काही दुर्गम भाग गेल्या ८ दिवसांपासून अंधारात आहेत. या पार्श्वभूमीवर यंत्रणेला आवश्यक असलेले सर्व साहित्य आणि अतिरिक्त मनुष्यबळ तातडीने उपलब्ध करून देऊन, युद्धपातळीवर नियोजन करत वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे निर्देश अप्पर मुख्य सचिव लोकेश चंद्रा यांनी दिले. तसेच धोकादायक ठिकाणांची ओळख पटवून नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

सिंधुदुर्ग हा दुर्गम जिल्हा असून येथे दरवर्षी अतिवृष्टीचा मोठा परिणाम होतो. ही बाब लक्षात घेता केवळ पावसाळा सुरू झाल्यानंतर नव्हे, तर जानेवारी महिन्यापासूनच आवश्यक नियोजन आणि पूर्वतयारी सुरू करावी, असे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी बैठकीत दिले. अल निनोच्या प्रभावामुळे हवामानातील बदल लक्षात घेऊन आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी यंत्रणेची टीम पूर्णपणे सज्ज ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भविष्यात अशा परिस्थितीत नागरिकांना कमीत कमी त्रास होईल यासाठी प्रभावी नियोजन करावे आणि वारंवार दुर्घटना घडणाऱ्या ठिकाणांची विशेष पाहणी करून प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशा सूचना पालकमंत्री नितेश राणे आणि अप्पर मुख्य सचिव लोकेश चंद्रा यांनी संयुक्तपणे प्रशासनाला दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here