सावंतवाडी,दि.०४: मनसेतील अंतर्गत व नेमलेल्या पक्ष निरीक्षक यांनी केलेल्या गटबाजीच्या राजकारणाला कंटाळून मनसेच्या बांदा विभागातील व सावंतवाडी शहरातील पदाधिकाऱ्यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना बांदा विभागातील व सावंतवाडी शहरातील माजी पदाधिकारी बांदा माजी विभाग अध्यक्ष नाना सावंत,शहराध्यक्ष बाळा बहिरे, डिंगणे शाखाध्यक्ष तथा ग्रा.प सदस्य आदेश सावंत, इन्सुलि शाखा अध्यक्ष सुरेंद्र कोठावळे, दिनेश मुळीक तसेच सावंतवाडी माजी शहर उपाध्यक्ष शुभम सावंत,प्रवीण गवस,देवेंद्र कदम,ललिता नाईक यांच्या सह २० पदाधिकाऱ्यांनी पक्षाला सोडचिट्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे. मागील वर्षभरापासून पक्षातील चाललेली अंतर्गत गटबाजी व त्यातून काम करणाऱ्यांना डावलले जाण्याच्या गलिच्छ राजकारणाला कंटाळून व नेमलेले निरीक्षक यांचा मनमानी कारभारामुळे राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे कळते.मागील दोन दिवसांपासून मनसे संघटनेतील पडझड थांबण्याचे नाव घेत नसून संघटनेला मोठा फटका बसणार असल्याचे म्हटले जात आहे. सावंतवाडी सह प्रत्येक तालुक्यात राजीनामा सत्र सुरूच आहे.