Home News तितिक्षा आंतरराष्ट्रीय ग्रंथ पुरस्कारात ‘कोमसाप’ सिंधुदुर्गची हॅट्ट्रिक

तितिक्षा आंतरराष्ट्रीय ग्रंथ पुरस्कारात ‘कोमसाप’ सिंधुदुर्गची हॅट्ट्रिक

0
1

दीपक पटेकर, उज्ज्वला धानजी आणि हिर्लेकर गुरुजींचा गौरव

कोल्हापूर,दि.०९: तितिक्षा भावार्थ सेवा अंतर्गत तितिक्षा इंटरनॅशनल पुणे आयोजित ‘तितिक्षा आंतरराष्ट्रीय ग्रंथ पुरस्कार’ प्रदान सोहळा शनिवार, दिनांक ६ जून २०२६ रोजी कोल्हापूर येथील हॉटेल अयोध्याच्या सभागृहात अत्यंत दिमाखात संपन्न झाला. या सोहळ्यात कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप) सिंधुदुर्गच्या तीन साहित्यिकांनी आपापल्या साहित्यकृतींसाठी पुरस्कार मिळवून हॅट्ट्रिक साधली. यामध्ये कोमसाप सावंतवाडीचे अध्यक्ष दीपक पटेकर (दीपी) यांच्या “बकुळीची फुले” काव्यसंग्रहाला ‘सर्वोत्कृष्ट काव्यसंग्रह’, मालवण शाखेच्या सदस्या सौ. उज्ज्वला धानजी यांच्या “आठवणींच्या हिंदोळ्यावर” या संग्रहाला ‘सर्वोत्कृष्ट लेखसंग्रह’ आणि ज्येष्ठ सदस्य दत्तात्रय शिवराम हिर्लेकर गुरुजी यांच्या “कर्तव्यपूर्ती” या पुस्तकाला ‘सर्वोत्कृष्ट आत्मचरित्र’ हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. ९८ वर्षीय द. शि. हिर्लेकर गुरुजींच्या वतीने त्यांचा पुत्र शशांक हिर्लेकर याने हा सन्मान स्वीकारला.

या सोहळ्याच्या व्यासपीठावर स्वागताध्यक्ष तथा राष्ट्रपती पदक विजेते पर्यावरण तज्ज्ञ ॲड. तुषार शिवशरण, सोल्यूशन माईंडचे सुजित दातार, माजी आमदार जयश्री जाधव, कोळी नटसम्राट लोककलाकार राजेश खर्डे वेसावकर, ज्येष्ठ नाट्य अभिनेत्री शमा वैद्य, अभिनेत्री वैशाली राजशेखर, जयमाला इनामदार, चित्रा साठे आणि शंकर अंदानी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी प्रास्ताविक करताना तितिक्षाच्या अध्यक्षा प्रिया दामले यांनी सांगितले की, मराठी भाषेतील दर्जेदार साहित्याला जागतिक स्तरावर प्रोत्साहन देण्यासाठी संस्थेमार्फत प्रतिवर्षी हे पुरस्कार दिले जातात. स्वागताध्यक्ष ॲड. तुषार शिवशरण यांनी पर्यावरण रक्षणाचा संदेश देत तितिक्षाच्या उपक्रमाचे कौतुक केले, तर माजी आमदार जयश्री जाधव यांनी सर्व सन्मानप्राप्त साहित्यिकांचे अभिनंदन केले.

याप्रसंगी आयोजित कवी संमेलनात कवी दीपी यांनी सादर केलेल्या “डोळ्यात बापाच्या मला सुखदुःख सारे काय दिसते, अन् पापणी लवताच माझी राबणारी माय दिसते” या रचनेला रसिकांची मोठी दाद मिळाली. कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात वैवाहिक आयुष्याची ५० वर्षे पूर्ण केलेल्या जोडप्यांचा मंगलाष्टकांच्या स्वरात आणि पारंपरिक पद्धतीने सन्मान करण्यात आला. हा सोहळा तितिक्षा इंटरनॅशनल पुणे, सोलुशनमाईंड पुणे व श्रीद्या क्रिएशन यांनी संयुक्तपणे आयोजित केला होता. आयोजनात सहकार्य करणाऱ्या अजिता मुळीक, गौरव पुंडे, भालचंद्र शिर्के यांचाही यावेळी गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रिया दामले आणि श्री गुरुदत्त दिनकर वाकदेकर यांनी केले. कोल्हापूरच्या भूमीत पुण्यातील संस्थेने केलेल्या या नेटके नियोजनाबद्दल सर्व उपस्थितांनी आयोजकांचे विशेष कौतुक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here