Home News सिंधुदुर्गच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा: आडाळी एमआयडीसीत १०० कोटींचा ‘डेटा सेंटर कंटेनर’...

सिंधुदुर्गच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा: आडाळी एमआयडीसीत १०० कोटींचा ‘डेटा सेंटर कंटेनर’ प्रकल्प; आमदार दीपक केसरकर यांची माहिती

0
3

स्थानिक तरुणांना रोजगाराची मोठी संधी; सावंतवाडी व परिसरात विविध विकासकामांचा धडाका

सावंतवाडी,दि.२२: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा देणारी एक अत्यंत मोठी आणि दिलासादायक घोषणा सावंतवाडीत करण्यात आली आहे. दोडामार्ग तालुक्यातील आडाळी एमआयडीसीमध्ये तब्बल १०० कोटी रुपयांची गुंतवणूक करून अत्याधुनिक डेटा सेंटर कंटेनर उत्पादन प्रकल्प उभारला जाणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून शेकडो स्थानिक युवक-युवतींना रोजगाराच्या नव्या आणि उत्तम संधी उपलब्ध होणार आहेत. माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत ही महत्त्वाची माहिती दिली. विशेष म्हणजे, “माझ्या वाढदिवसानिमित्त माझे मित्र उद्योजक सुनील पैकाणे यांनी दिलेली ही अत्यंत अनमोल भेट आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या पत्रकार परिषदेला क्रिएटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग सोल्युशन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे मालक सुनील पैकाणे आणि संचालक संदीप रेडकर उपस्थित होते.

आमदार केसरकर यांनी यावेळी भूतकाळातील आठवणींना उजाळा देत सांगितले की, २०१० मध्ये बांदा-वाफोली येथे सुरू झालेल्या पैकाणे यांच्या उद्योगसमूहात आज सुमारे ७०० स्थानिक युवक कार्यरत आहेत. त्याच यशस्वी धर्तीवर आता आडाळी एमआयडीसीमध्ये शंभर कोटींची भरीव गुंतवणूक करून हा अत्याधुनिक प्रकल्प साकारला जाणार आहे. या प्रकल्पाच्या जागेसंदर्भात उद्या मुंबईत उद्योग मंत्र्यांसोबत एक विशेष बैठक होणार असून, कंपनीला सहा एकर जागा उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे. यामुळे आडाळी एमआयडीसीला खऱ्या अर्थाने नवसंजीवनी मिळणार असून परिसरातील युवकांसाठी रोजगाराचे नवे दालन खुले होणार आहे. उद्योजकांची सोय व्हावी यासाठी प्रत्येक गुरुवारी एमआयडीसीचे अधिकारी आडाळी येथे प्रत्यक्ष उपलब्ध राहतील, अशी माहितीही त्यांनी दिली. आडाळी एमआयडीसीत अधिकाधिक उद्योग आणून सिंधुदुर्गातील तरुणांचे हात रोजगाराने बळकट करणे हेच आपले मुख्य ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

प्रकल्पाबाबत अधिक माहिती देताना उद्योजक सुनील पैकाणे म्हणाले की, जमिनीचा ताबा मिळाल्यानंतर पुढील सहा ते आठ महिन्यांत प्रत्यक्ष उत्पादन सुरू करण्याचे आमचे नियोजन आहे. या कंपनीमध्ये दहावी उत्तीर्ण आणि आयटीआय शिक्षण घेतलेल्या स्थानिक युवकांना प्राधान्याने रोजगार दिला जाईल. आम्ही जिथे उद्योग उभारतो, तिथल्या स्थानिकांना प्रथम संधी देण्याची आमची जुनी परंपरा आहे. वाफोली येथे आमचे चार कारखाने आधीच यशस्वीपणे सुरू असून, भविष्यात जागा उपलब्ध झाल्यास तिथे आणखी विस्तार करण्यात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या पत्रकार परिषदेत केसरकर यांनी मतदारसंघातील इतर महत्त्वाकांक्षी विकासकामांचा आढावा घेतला. सावंतवाडीतील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल लवकरच पूर्णत्वास जात असून दोडामार्ग रुग्णालयाचे काम अंतिम टप्प्यात आहे. तसेच वेंगुर्ला आणि शिरोडा येथे वैद्यकीय अधिकारी उपलब्ध करण्यावर विशेष भर दिला जात आहे. सावंतवाडीत बीओटी तत्त्वावर आधुनिक ‘बस पोर्ट’, पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकारातून बोट बांधणी उद्योग, तिलारी येथे अॅम्युझमेंट पार्क, वॉटर स्पोर्ट्स व अॅनिमल सेंटर, तर आंबोलीत गोल्फ कोर्स व अॅडव्हेंचर स्पोर्ट्स साकारले जाणार आहेत. यासोबतच सावंतवाडीत शिर्डीच्या धर्तीवर भव्य साई मंदिर उभारण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. यासाठी आपले वडील कै. वसंतशेठ केसरकर यांच्या नावाने चॅरिटेबल ट्रस्ट स्थापन करून गरजूंना मदत आणि मंदिर उभारणीचे सामाजिक कार्य हाती घेणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here