Home News चिंदर येथील दहावी-बारावीच्या ४३ गुणवंत विद्यार्थ्यांचा थाटात गुणगौरव सोहळा..!

चिंदर येथील दहावी-बारावीच्या ४३ गुणवंत विद्यार्थ्यांचा थाटात गुणगौरव सोहळा..!

0
5

‘सुविद्या इन्स्टिट्यूट’ आणि ‘सरस्वती वाचनालय’चा स्तुत्य उपक्रम

    मालवण, दि.०८: स्वतःची आवड, क्षमता आणि भविष्यातील संधी यांचा योग्य ताळमेळ साधून करिअरची निवड करा. केवळ इतरांचे अनुकरण न करता स्वतःचे व्यक्तिमत्त्व आणि मूल्ये ओळखून निर्णय घेतल्यास करिअरमध्ये आनंद आणि यश दोन्ही मिळतात. आज कला क्षेत्रात काम करण्यासाठी पेंटरपासून ते मोठ्या आर्टिस्टपर्यंत अनेक संधी उपलब्ध असून विद्यार्थ्यांनी अशा क्षेत्राकडे वळल्यास आमची नेहमीच सहकार्याची भूमिका राहील, असे प्रतिपादन मुंबईस्थित कला शिक्षक गणेश अपराज यांनी केले. श्री देवी सरस्वती वाचनालय व ग्रंथसंग्रहालय चिंदर आयोजित आणि सुविद्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई पुरस्कृत चिंदर गावातील इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा भव्य गुणगौरव सोहळा शनिवार, ६ जून रोजी शाळा चिंदर नं. १ येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी ते मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

    कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून तसेच सरस्वती माता व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. या सोहळ्यात गावातील ४३ गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यामध्ये इयत्ता दहावीतून गावात प्रथम आलेली उर्वशी पारकर, द्वितीय ॲरोन फर्नांडिस व तृतीय धनश्री भावे, तसेच बारावीमधून प्रथम राजश्री बारंगळे, द्वितीय रिद्धी अपराज व तृतीय गौरव दत्तदास आणि सी.बी.एस.ई. बोर्डातून दहावी उत्तीर्ण झालेली दुर्गा म्हापसेकर हिचा विशेष सन्मान करण्यात आला. याप्रसंगी मार्गदर्शन करताना हवालदार संतोष सावंत यांनी कोकणातील विद्यार्थ्यांनी केवळ मुंबईची वाट न धरता सैन्य दल आणि स्पर्धा परीक्षांकडे वळण्याचे आवाहन केले. बारावी विज्ञान शाखेनंतर सैन्य दलात विविध संधी असून ‘अग्नीवीर’ योजनेच्या माध्यमातून विद्यार्थी थेट देशसेवेत सामील होऊन स्वतःची वेगळी ओळख निर्माण करू शकतात, असे त्यांनी आवर्जून सांगितले.

    वाचनालयाचे अध्यक्ष व सुविद्या इन्स्टिट्यूटचे संचालक प्रकाश मेस्त्री यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा देताना कै. वसंत मेस्त्री यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवण्याचा सल्ला दिला. चिंदरच्या मातीत शिकून मुंबईत नामांकित शिक्षण संस्था स्थापन करणाऱ्या मेस्त्रींचे हजारो विद्यार्थी आज देश-विदेशात नाव कमावत आहेत, त्याचप्रमाणे येथील विद्यार्थ्यांनीही प्रगती करून गावाचे व आई-वडिलांचे नाव उज्ज्वल करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच पुढील शिक्षणासाठी सरस्वती वाचनालय आणि सुविद्या इन्स्टिट्यूट सदैव पाठीशी राहतील, अशी ग्वाही दिली. यावेळी शशिकांत नाटेकर यांनी मोबाईलचा मर्यादित वापर करण्यावर भर दिला, तर माजी सभापती हिमाली अमरे यांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करतानाच पाल्यांच्या कौतुक सोहळ्याला पालकांनी उपस्थित राहणे गरजेचे असल्याची खंत व्यक्त केली. या सोहळ्याला संतोष पाताडे, स्वरा पालकर, मोरेश्वर गोसावी, गोपाळ चिंदरकर, पोलीस पाटील दिनेश पाताडे यांच्यासह अनेक मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रावजी तावडे यांनी केले, तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सिद्धेश गोलतकर यांनी मानले.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here