प्रतिनिधी: गणेश नाईक
देवगड,दि.१६: तालुक्यात चाफेड येथील दुर्गाचा डोंगर या ऐतिहासिक ठिकाणाचा फेब्रुवारी महिन्यात दुर्ग मावळा प्रतिष्ठान व चाफेड ग्रामस्थ यांच्यातर्फे भ्रमंती व अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता. या डोंगरावरील अनेक वास्तू पाहिल्यास या ठिकाणी एखाद्या गडाच्या पाऊलखुणा दिसत होत्या परंतु स्थानिक लोकांशी चर्चा करत असता याबाबत काहीच माहिती हाती पडत नव्हती. मार्च व एप्रिल मध्ये दुर्ग मावळा प्रतिष्ठान व चाफेड ग्रामस्थ यांच्या वतीने दोन संवर्धन व स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आल्या त्यामध्ये घोड्याची पाग, राजवाडा, चौकोनी विहीर या ठिकाणाची स्वच्छता करण्यात आली.या डोंगराच्या पश्चिम दिशेला आपणास साळशी महाल अर्थात सदानंदगड अवघ्या तीन ते चार किलोमीटर अंतरावर असून तो डोळ्यांनी सहज दिसतो. त्यामुळे या डोंगराला त्यावेळी नक्कीच महत्व प्राप्त झालेले असावे. या ठिकाणचा इतिहास शोधण्यासाठी अनेक लोकांशी चर्चा केली परंतु माहिती काही मिळत नव्हती. पुन्हा एकदा माझ्याकडील गड किल्ल्यांची पुस्तके वाचायला घेतली सदानंद गड व आंग्रेंच्या इतिहासाचा ज्याठिकाणी उल्लेख असेल त्या ठिकाणी या डोंगराचा उल्लेख नक्की सापडेल याची खात्री होती. सतीश अक्कलकोट व संदिप तापकीर यांच्या पुस्तकात काही संदर्भ आढळले. सदानंद गडाच्या माध्यभागी एक तटबंदी आहे. ही भिंत गडाच्या मध्यभागी असल्याचे पाहून आपण आश्चर्यचकित होतो; पण त्यापाठीमागे एक इतिहास दडला आहे. साळशी महाल व हा सदानंदगड यांच्या मालकी हक्कावरून सरखेल कान्होजी आंग्रे आणि सावंतवाडीचे खेम सावंत यांच्यात कायम वाद होत असत. म्हणून शाहूराजांनी ११ मार्च १७२४ रोजी आंग्रेंना पत्र पाठवून सदानंदगड, साळशी निम्मा-निम्मा वाटून घ्यायला सांगितला. त्याची कार्यवाही करताना आंग्रेंनी साळशी महालाचे दोन भाग केले, त्याचप्रमाणे सदानंदगडावर पूर्व-पश्चिम अशी ही उभी भिंत बांधली. दक्षिणेचा भाग सावंतांना दिला, तर उत्तरेकडील भाग आंग्रेंनी स्वतःकडे ठेवला. सावंतवाडीचे सावंत हे आपले धनी करवीरांविरूध्द नेहमी कारस्थान करीत असल्याने त्यांच्यात नित्य लढाई होत. करवीरकरांनी सन १७१९ मध्ये सावंतावर स्वारी केली आणि याच वेळी कान्होजी आंग्रेनी देखील आपला वैरी सावंतावर चाल केली. तेव्हा खेम सावंतानी पोर्तुगीजांकडे मदत मागितली. ३ नोव्हें १७१९ या दिवशी व्हाईसरॉयने सावंताकडून आलेले पत्र सभेपुढे वाचून दाखवले त्यात लिहिले होते की,
" संभाजी राजे यांनी कुडाळचा किल्ला घेतला... आता कान्होजी आंग्रे यांनी फोंड सावंत ह्यांच्यावर चालून येत आहेत. ते त्यांच्या राज्याच्या हद्दीला येऊन भिडले आहेत. त्यांनी तिकडे दोन किल्ले बांधले आहेत. त्या किल्ल्याच्या सहाय्याने पुढे आक्रमण करण्याचा त्यांचा इरादा आहे...ह्या राज्याच्या मदतीशिवाय त्यांना (सावंत) शत्रूशी दोन हात करता यावयाचे नाही."
” दहा तोफा शिवाय पांचशे तोफांचे गोळे दोन किल्ल्यांच्या रक्षणासाठी त्यांना हवे आहेत. हे दोन किल्ले त्यांनी आंग्यांच्या किल्ल्यासमोर बांधिले आहेत. पुनः त्यांना पन्नास घोड्यांची व युद्धनौकांचीही मदत हवी आहेत.” वरील पत्रात कान्होजी आंग्रेनी सावंतांच्या सरहद्दीवर येत दोन किल्ले बांधले असल्याचे स्पष्ट म्हटले आहे. आता हे दोन किल्ले कुठले हे पाहताना सावंतांची सरहद्द कुठवर होती हे पाहणे महत्त्वाचे आहे. साळशी महाल हे सावंत व आंग्रे यांच्या सीमेवरील अतिशय महत्त्वाचे तालुक्याचे ठिकाण व बंदर होते. सावंतांनी, शाहू राजेंची चाकरी स्विकारल्यावर शाहू राजेंनी त्यांना साळशी तालुक्यातील गांवाचे अर्धे उत्पन्न नेमून दिले व अर्धे उत्पन्न आंग्रे घेत होते. मात्र दोघांच्यात वैर होते. त्यात साळशी हे कारण निर्माण झाले. आता साळशी तालुक्यातील सावंतांच्या सरहद्दीवर येत कान्होजी आंग्रेनी दोन किल्ले बांधले. यातील एक किल्ला म्हणजे निश्चितच कोटकामते असणार. कारण कोटकामते हे गांव साळशी तालुक्यात मोडत होते. पोर्तुगीज पत्रात मसुरेची नदी म्हणजेच कालावली खाडी हे आंग्रे व सावंत यांच्यामधील सरहद्द आहे अशी माहिती मिळते. कामतेच्या अलीकडील मुलुखावर आंग्रेचे वर्चस्व नव्हते. दुण्डागड, दुण्डा डोंगर व इतर किल्ल्यांची माहिती कागदपत्रात मिळतात. मात्र त्यांचे स्थान यापूर्वी झालेल्या संशोधनात तरी सापडले नाही. विजयदुर्ग हे पेशव्यांच्या अंमलाखाली असताना धुळप हे तेथील सुभेदार होते. सन १७७७ मध्ये विजयदुर्ग येथील धुळपानी करवीर राज्याच्या सीमेवर किंवा त्यांच्या मुलूखात असणाऱ्या दुण्डाडोंगर येथे किल्ला बांधण्यास घेतला होता. ही माहिती करवीर छत्रपतींना समजताच त्यांनी १३ सप्टेंबर १७७७ रोजीच्या पत्रात गगनगडचे भगवंतराव प्रतिनिधी यांना दुण्डागड बांधण्यापासून विजयदुर्गकरांना रोखण्यास सांगितले होते. करवीर छत्रपती प्रतिनिधींना लिहितात की,
” विजयदुर्गकरी यानी जमाव करून दुण्डागड बांधावा ही योजना आरंभीली आहे म्हणोन विनंती पत्री लिहिले अशास आबाजीराव पंडित प्रतिनिधी यांचा प्रांत लगतेस आहे. तरी तुम्ही आबाजी पंडितासी सांगोन दुण्डा डोंगरास चोकीस जमाव लोक ठेवून तेथे कोणी डोंगर बांधो न द्यावे. याप्रमाणे बंदोबस्त करवणे यासी अंतर जाहालेस स्वामी तुम्हास आज्ञा करून विचारतील हे समजोन तेथील बंदोबस्त करवणे जाणीजे” हा दुण्डागड बांधून पूर्ण झाला अथवा
नाही यासंबंधी काही माहिती मिळत नाही. आणि दुण्डागड किंवा दुण्डाडोंगराचे स्थान देखील सांगता येत नाही असे वरील लेखकांच्या पुस्तकात म्हटलेले आहेत. वरील सर्व संदर्भाँचा विचार केला असता दुण्डा या शब्दाचा अपभ्रंश होऊन तो दुर्ग-दुर्गा असा झाला असावा. त्यामुळे दुण्डा डोंगर हा दुर्गाचा डोंगर संबोधला जाऊ लागला. म्हणजे कागदावर फक्त उल्लेख असलेले दुण्डागड हे ठिकाण दुसरे तिसरे कोणते ठिकाण नसून आताचे दुर्गाचा डोंगर हेच ठिकाण असावे. या संबंधी अजून काही संदर्भ मिळाल्यावर याची पुष्टी होण्यास मदत मिळू शकेल. या गडामुळे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गडकिल्यांमध्ये अजून एका गडाची भर पडली असे म्हणावयास हरकत नाही. आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अशी अनेक ठिकाणे आहेत की ज्या ठिकाणांचा शोध तसेच त्या ठिकाणांचा इतिहास शोधणे गरजेचे आहे. (संदर्भ : मालवणी मुलुखातील इतिहासाचे पाहारेकरी - श्री संदिप तापकीर, गडकिल्ले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील - श्री सतिश अक्कलकोट)