तलावा काठी भरविला जाणारा आठवडा बाजार अन्यत्र हलवू नये..

0
144

सिंधुदुर्ग हॉकर्स संघटनेच्या वतीने पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना देण्यात आले निवेदन

सावंतवाडी,दि.११ : शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आठवडा बाजारासाठी सुचविलेली जागा चुकीची आहे. त्या ठिकाणी रस्ता अरुंद असल्यामुळे गर्दी होऊन चोरी किंवा महिलांची छेडछाडीचे प्रकार होऊ शकतात. तसेच चार वेगवेगळ्या ठिकाणी बाजार भरविल्यास त्याचा त्रास सर्व नागरिकांना सहन करावा लागेल. त्यामुळे पर्यायी जागा उपलब्ध होईपर्यंत तलावा काठी भरवीला जाणारा आठवडा बाजार अन्यत्र हलवू नये, अशी मागणी सिंधुदुर्ग हॉकर्स संघटनेच्या वतीने अध्यक्ष ॲड. संदीप निंबाळकर यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, माजी नगराध्यक्ष संजू परब, माजी नगरसेवक मनोज नाईक, आनंद नेवगी, बंटी राजपुरोहित आदींसह मोठ्या संख्येने हॉकर्स संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
सावंतवाडी शहरात दर मंगळवारी आठवडा बाजार भरतो. या बाजारासाठी सुमारे २०० ते २५० फेरीवाले आपला करतात. आठवडा बाजारामध्ये सावंतवाडी शहर व पंचक्रोशीतील गरीब, मध्यमवर्गीय लोकांना कमी व रास्त दरात ताजा माल उपलब्ध होतो. त्यामुळे ग्राहक आठवडयाच्या जीवनावश्यक वस्तुंची खरेदी या आठवडा बाजारामध्ये करतात. अलिकडेच श्री. केसरकर यांनी पत्रकार परीषद घेवून आठवडा बाजाराची जागा बदलत आहोत व आठवडा बाजार चार वेगवेगळ्या ठिकाणी भरवण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे.
हा निर्णय घेण्यापूर्वी प्रशासनाने अथवा लोकप्रतिनिधींनी आम्हा फेरीवाल्यांची बाजू व याबाबतचे म्हणणे समजून घेतलेले नाही. तसेच आम्हाला या प्रकरणी आपली बाजू मांडण्याची संधी दिलेली नाही. यापूर्वी देखील सावंतवाडी शहरातील आठवडा बाजार स्थानिक व्यापाऱ्यांच्या तक्रारीवरून फेरीवाले व आठवडा बाजारात खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांची याबाबतची मते जाणून न घेता एकतर्फा आठवडा बाजाराचे ठिकाण बदलेले होते. सर्वोच्य न्यायालयाने हॉकर्स संदर्भात प्रशासनाची काय भुमिका असली पाहीजे याबाबत वेळोवेळी आपल्या न्यायनिर्णयाव्दारे निर्देशित केलेले आहे.
सावंतवाडी नगरपरीषदेने हॉकर्स संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार करावयाच्या समितीमध्ये आंम्हा फेरीवाल्यांना प्रतिनिधीत्व दिलेले नाही. अथवा हॉकर्स संदर्भातील कोणतेही धोरणात्मक निर्णय घेतेवेळी आमच्या संघटनेस अथवा आमच्या प्रतिनिर्धीना बाजू मांडण्याची संधी दिलेली नाही . या सर्व घटनाक्रमाचा एकत्रित विचार करता प्रशासन आठवडा बाजार , फेरीवाले यांच्या संदर्भातील धोरणात्मक निर्णय एकतर्फी मनमानीपणे व फेरीवाल्यांशी कोणतीही चर्चा न करता वारंवार घेत असल्याचा आरोप हॉकर्स संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here