सावंतवाडी, दि.०२: आपण ज्या शाळेत शिकलो, मोठे झालो, त्या शाळेप्रती असलेली कृतज्ञता जपत इन्सुली येथील माजी विद्यार्थ्यांनी एक आदर्श पायंडा घालून दिला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जि. प. पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा इन्सुली नंबर ४ च्या १९९९-२००० या वर्षातील सातवीच्या माजी विद्यार्थ्यांतर्फे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत छत्र्यांचे वाटप करण्यात आले. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच हक्काची छत्री मिळाल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद ओसंडून वाहत होता. १९९९-२००० या बॅचचे हे स्नेहाचे आणि मदतीचे नाते केवळ या वर्षापुरते मर्यादित नसून, या माजी विद्यार्थी बॅचकडून दरवर्षी शाळेतील गरजू आणि सर्व मुलांसाठी विविध प्रकारचे शैक्षणिक साहित्य मोफत वाटप केले जाते. आपल्या यशात मोलाचा वाटा असलेल्या या शाळेचे ऋण फेडण्यासाठी आणि सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी हा उपक्रम सातत्याने राबवला जात असल्याचे माजी विद्यार्थ्यांनी यावेळी सांगितले.
छत्री वाटपाच्या या विशेष कार्यक्रमाला माजी विद्यार्थी नवज्योत गावडे, वासुदेव गावडे, सुधीर गावडे, निलेश परब, रसिका मुळीक, सुकांती सावंत आणि सीमा पार्सेकर हे खास उपस्थित होते. याप्रसंगी त्यांनी आपल्या शालेय जीवनातील जुन्या आठवणी आणि अनुभव पुन्हा एकदा जिवंत केले. शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन आणि शाळेने दिलेले संस्कार यामुळेच आपण आज आयुष्यात स्थिरस्थावर होऊ शकलो, अशी कृतज्ञ भावनाही त्यांनी व्यक्त केली. माजी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे कौतुक करताना शाळेचे मुख्याध्यापक रुपेश परब म्हणाले की, आपण ज्या शाळेत शिकलो, तिची प्रगती आणि तिथल्या विद्यार्थ्यांची सोय पाहणे हे आपले कर्तव्य आहे. या बॅचचा हा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद असून, इतर बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनीही यातून प्रेरणा घेऊन असाच आदर्श समाजासमोर ठेवावा.
या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका श्रीम. करमळकर मॅडम यांनी केले. कार्यक्रमाच्या सांगतेवेळी मुख्याध्यापक रुपेश परब यांनी उपस्थित सर्व माजी विद्यार्थ्यांचे कौतुक करून शाळेप्रती दाखवलेल्या या आपुलकीबद्दल सर्वांचे मनापासून आभार मानले. माजी विद्यार्थ्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे सद्या इन्सुली परिसरात आणि शिक्षण क्षेत्रात सर्वत्र भरभरून कौतुक होत आहे.



