याबाबत “अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे” यांच्याकडे देण्यात आले निवेदन..
सिंधुदुर्ग, दि.२१: रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांची झालेली निर्घृण हत्या आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पत्रकारांवर होत असलेले हल्ले किंवा खोटे गुन्हे दाखल करण्याच्या घटनांसंदर्भात पत्रकार संरक्षण समिती (महाराष्ट्र)सिंधुदुर्गच्या पदाधिकाऱ्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांना लेखी निवेदन देत,प्रशासनाचे या गंभीर बाबींकडे लक्ष वेधले आहे.
निर्भिड पत्रकार शशिकांत वारिसे यांची झालेली निर्घृण हत्येची केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची आग्रही मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली.
याबरोबरच पुरोगामी महाराष्ट्र राज्यात पत्रकारांवर वारंवार हल्ले होण्याच्या घटनेत वाढ होत असून, पत्रकारांवर हल्ले करून किंवा त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो,यासाठी ‘पत्रकार संरक्षण कायद्याची’ कडकपणे अंमलबजावणी करावी,अशी मागणी पत्रकार संरक्षण समिती सिंधुदुर्गच्या जिल्हा कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांकडून अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी पत्रकार संरक्षण समितीचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रसाद मडगांवकर, जिल्हाउपाध्यक्ष संजय पिळणकर,जिल्हासचिव शैलेश मयेकर, खजिनदार वासुदेव उर्फ नयनेश गावडे,जिल्हा संघटक जाफर याकूब शेख,सहसचिव यशवंत कृष्णा माधव,सहखजिनदार मदन शंकर मुरकर आदी समितीचे सभासद प्रतिनिधी उपस्थित होते.