गेल्या अनेक वर्षांचे तंटे मिटवून लोकसहभागातून ट्रॅक्टर थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी
सावंतवाडी,दि.१९: राज्य शासनाच्या आदेशानुसार ‘मुख्यमंत्री शेतपाणंद रस्ते’ मोकळे करण्याच्या मोहिमेला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कास गावामध्ये मोठे यश आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत असलेले गावातील तब्बल ९ शेतपाणंद रस्ते कासचे सरपंच प्रवीण पंडित यांनी ग्रामपंचायत अधिकारी श्री. ठाकूर आणि स्थानिक शेतकऱ्यांच्या अभूतपूर्व सहकार्यातून यशस्वीरीत्या खुले केले आहेत. या कौतुकास्पद कामगिरीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील यांनी नुकतीच कास गावाला अचानक भेट दिली. शेतातील पिकांची ने-आण सुलभ व्हावी आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांना आपल्या मालाला योग्य हमीभाव मिळावा, यासाठी थेट शेताच्या बांधापर्यंत यंत्रसामुग्री व वाहने पोहोचवण्याचे जे काम सरपंचांनी केले आहे, त्याबद्दल तहसीलदार पाटील यांनी त्यांचे विशेष कौतुक केले.

गेल्या अनेक वर्षांपासून कास गावामध्ये या शेत रस्त्यांवरून विविध तंटे आणि वादविवाद सुरू होते. मात्र, ‘आदर्श सरपंच पुरस्कार’ प्राप्त प्रवीण पंडित यांनी यातून मार्ग काढत गावात अत्यंत जोमाने काम सुरू केले. “माझा शेतकरी बांधव खचला नाही पाहिजे,” याच उदात्त उद्देशाने त्यांनी हे बंद रस्ते मोकळे करत परिसरात एक नवा आदर्श निर्माण केला आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची त्यांनी गावात प्रभावी अंमलबजावणी केली असून, प्रशासनाचा शासकीय निधी वेळेत आणि योग्य ठिकाणी खर्च करून गावाच्या विकासात मोठे योगदान दिले आहे. विशेष म्हणजे, यातील काही रस्ते त्यांनी स्वतःच्या वैयक्तिक खर्चातून, तर काही रस्ते लोकसहभागातून सुरू केले आहेत. यामुळे सध्या गावात कमालीचे उत्साहाचे वातावरण असून शेतकरी वर्ग अत्यंत समाधानी आहे; कारण आता शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर थेट शेतात पोहोचणार आहे.
या पाहणी दौऱ्यादरम्यान तहसीलदार श्रीधर पाटील यांनी सरपंचांच्या कार्यपद्धतीचा गौरव केला. कोणत्याही प्रकारचे वादविवाद न करता, शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन आणि त्यांची समजूत काढून एवढ्या मोठ्या लांबीचे रस्ते गावात तयार करणे ही खरोखरच कौतुकास्पद बाब असल्याचे त्यांनी सांगितले. लोकसहभागाच्या या मोहिमेत पंडितवाडी ते किनळेकरवाडी रस्ता आणि किनळेकरवाडी ते पार हद्दीपर्यंतचा शेतपाणंद रस्ता यांसारखे अनेक महत्त्वाचे रस्ते पूर्ण करण्यात आले आहेत. या यशाबद्दल बोलताना सरपंच प्रवीण पंडित यांनी, गावातील भुईमूग, शेंगदाणे, चवळी, नाचणी या पिकांना योग्य हमीभाव मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगितले. तसेच या कामासाठी ‘कास गाव विकास मंडळ, मुंबई’ आणि समस्त ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले, ज्यामुळेच हे अशक्य कोटीतील काम शक्य झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
या महत्त्वपूर्ण पाहणी प्रसंगी सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील यांच्यासोबत कास ग्राममहसूल अधिकारी सीमा कांबळे, कोतवाल विनोद धुरी, सरपंच प्रवीण पंडित, ग्रामपंचायत सदस्य विश्वनाथ पंडित, तसेच ग्रामस्थ नारायण पंडित, अभिमान्यू कासकर, पांडुरंग पंडित, नामदेव पंडित, जयवंत पंडित, शशिकांत पंडित, शांताराम राणे, बाळकृष्ण पंडित, महादेव राणे, घनश्याम पंडित, काशीराम पंडित, अनिल किनळेकर आणि प्रवीण शांताराम पंडित आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. साखळी पद्धतीने आणि एकजुटीने केलेल्या या कामामुळे कास गावाने संपूर्ण तालुक्यासमोर एक नवा वस्तूपाठ ठेवला आहे.



