जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच आयोजन; पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार उद्घाटन
सावंतवाडी, दि.१९: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहकार क्षेत्राला अधिक बळकटी देण्यासाठी आणि सर्वसामान्यांचा आर्थिक आधार असणाऱ्या पतसंस्था चळवळीला नवी दिशा देण्यासाठी आंबोली येथे दोन दिवसीय भव्य महाअधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दिनांक २३ मे रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या हस्ते या ऐतिहासिक संमेलनाचे शानदार उद्घाटन होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सहकार इतिहासामध्ये पहिल्यांदाच अशा स्वरूपाचे भव्य आणि अभ्यासपूर्ण महाअधिवेशन संपन्न होत असून, यामुळे संपूर्ण जिल्ह्यात सहकार क्षेत्रात उत्साहाचे वातावरण आहे. हे अधिवेशन केवळ एक सोहळा नसून पतसंस्था समोरील आव्हाने आणि भविष्यातील संधी यावर मंथन करणारे व्यासपीठ ठरणार असल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा फेडरेशनचे अध्यक्ष सुनील राऊळ यांनी दिली आहे.
दिग्गजांची उपस्थिती आणि ५ कोटींवरील संस्थांचा सन्मान
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सध्या नागरी पतसंस्था, ग्रामीण बिगर शेती पतसंस्था आणि पगारदार पतसंस्था अशा विविध १५० पतसंस्था कार्यरत आहेत. या चळवळीने जिल्ह्याच्या ग्रामीण आणि शहरी अर्थकारणाला मोठा हातभार लावला आहे. ज्या संस्थांनी ५ कोटी रुपयांपेक्षा जास्त खेळते भागभांडवल उभे करून आदर्श निर्माण केला आहे, अशा सर्व यशस्वी सहकारी पतसंस्थांना या अधिवेशनामध्ये गौरव प्रमाणपत्र आणि सन्मान चिन्ह देऊन विशेष रितीने सन्मानित करण्यात येणार आहे. या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून आमदार दीपक केसरकर आणि आमदार डॉ. निलेश राणे उपस्थित राहणार असून, त्यांच्या हस्ते या संस्थांना गौरविण्यात येईल. तसेच, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी व जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत हे देखील या प्रसंगी उपस्थित राहून सहकार चळवळीला बळ देणार आहेत. या गौरवामुळे संस्थांना अधिक जोमाने कार्य विस्तार करण्याची प्रेरणा मिळेल, असा विश्वास फेडरेशनने व्यक्त केला आहे.
नवे तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा आणि कायदेशीर आव्हानांवर होणार मंथन
हे अधिवेशन विविध तांत्रिक आणि समकालीन विषयांवरील मार्गदर्शनाने वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे. सध्याच्या डिजिटल युगात संगणकीय तंत्रज्ञानात नव्यानेच समाविष्ट होणारे ‘ए आय’ (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञान आणि पतसंस्थांसमोरील आव्हाने यावर सखोल चर्चा होईल. याशिवाय, नव्याने लागू झालेल्या आदर्श उपविधी या महत्त्वपूर्ण विषयावर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हा उपनिबंधक सोपान शिंदे हे मार्गदर्शन करणार आहेत. पतसंस्थांना कर्ज वितरण आणि कर्ज वसुलीमध्ये येणाऱ्या क्लिष्ट समस्यांवर पुणे येथील तज्ज्ञ आर. बी. यादव हे उपाय सुचवणार आहेत, तर सध्याच्या काळातील सर्वात मोठा धोका असलेल्या सायबर क्राईमविषयी पुंडलिक सातोसे हे उपस्थितांना सतर्क करत मार्गदर्शन करतील.
तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि व्यवस्थापकीय मंडळाचे धाडसी पाऊल
पतसंस्थांच्या भविष्यातील वाटचालीचा वेध घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य फेडरेशनचे कार्याध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन हे आव्हाने आणि उपायांवर भाष्य करतील, तर दैनंदिन कामकाजातील ताणतणाव व्यवस्थापनावर पुणे येथील योगतज्ज्ञ अशोक देशमुख हे मार्गदर्शन करणार आहेत. या अधिवेशनात महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे उपाध्यक्ष डॉ. शांतीलालजी सिंगी, संचालक सुदर्शनराव भालेराव आणि कोकण विभाग नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष गिरीश तुळपुले यांसारखे सहकार क्षेत्रातील दिग्गज नेतृत्व मार्गदर्शन करणार आहे. शासन स्तरावरील प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी हे अधिवेशन एक अभ्यासपूर्ण दिशा देणारे ठरेल. या महाअधिवेशनाचे आयोजन करण्याचे धाडसी पाऊल फेडरेशनचे कार्याध्यक्ष जॉय डॉन्टस, उपाध्यक्ष नंदकिशोर कोरगांवकर, उपाध्यक्ष सुनील नाईक, संचालक बाबुराव कविटकर, अॅड. समीर वंजारी, विष्णू पराडकर, सुभाष चौधरी, तज्ज्ञ संचालक रमेश बोंद्रे व सचिव महेश्वर कुंभार यांच्यासह संचालक मंडळाने उचलले असून, या ऐतिहासिक अधिवेशनात जिल्ह्यातील सर्व पतसंस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन अध्यक्ष सुनील राऊळ यांनी केले आहे.



