सिंधुदुर्गात साकारणार राज्यातील पहिला आदर्श पत्रकार गृहनिर्माण प्रकल्प; गुणवंत पाल्यांचाही झाला गौरव
सिंधुदुर्गनगरी,दि.१८: सिंधुदुर्गातील जनतेने राणे कुटुंबावर नेहमीच भरभरून प्रेम आणि आशीर्वाद दिले आहेत. यामुळेच राणे कुटुंबाला राज्य आणि देशपातळीवर एक वेगळी ओळख मिळाली आहे, ही कृतज्ञता आम्ही कधीही विसरणार नाही. ज्येष्ठ नेते नारायण राणे साहेबांची कारकीर्द जवळून पाहणाऱ्या तमाम पत्रकार बांधवांना हे ठाऊक आहे की, त्यांनी मुख्यमंत्री, मंत्री आणि पालकमंत्री म्हणून काम करताना असंख्य लोकांना हक्काची घरे, नोकऱ्या मिळवून देत त्यांचे आयुष्य उभे करण्याची संधी दिली. आज महाराष्ट्राच्या कोणत्याही कोपऱ्यात गेले तरी राणेसाहेबांमुळे आमचे आयुष्य बदलले, असे सांगणारे अनेक जण भेटतात. त्यांनी जोडलेली ही माणसे टिकवणे आणि त्यांचा विकासाचा हा ऐतिहासिक वारसा पुढे नेणे हीच माझी मुख्य जबाबदारी आहे. माझ्या प्रत्येक निर्णयात आणि कामात तुम्हाला राणेसाहेबांच्या कार्यपद्धतीची झलक नक्कीच दिसेल. सिंधुदुर्गावर त्यांचे विशेष प्रेम होते आणि तेच प्रेम जपण्याचे काम आम्ही करत आहोत. पत्रकार मित्रांची इच्छा होती की हा प्रकल्प व्हावा आणि त्यासाठी लागणारे सर्व सहकार्य करण्याची जबाबदारी मी घेतली आहे. या प्रकल्पामुळे पत्रकारांच्या हक्काच्या घरांचे स्वप्न साकार होणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री नितेश राणे यांनी येथे केले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारांना सर्व सोयींनी परिपूर्ण आणि हक्काचे घर मिळावे या उदात्त उद्देशाने ओरोस सिंधुदुर्ग नगरी येथे उभारण्यात येत असलेल्या ‘सिंधूदर्पण’ या विशेष पत्रकार गृहनिर्माण प्रकल्पाचा भव्य भूमिपूजन सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या प्रसंगी आयोजित मुख्य कार्यक्रमात पालकमंत्री नितेश राणे बोलत होते. व्यासपीठावर जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख, विश्वस्त शरद पाबाले, सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, सिंधूदर्पण गृहनिर्माण सोसायटीचे चेअरमन संतोष राऊळ, सचिव दिलीप खडपकर, प्रदेश प्रतिनिधी गणेश जेठे, संतोष वयागणकार, शशी सावंत, शेखर संमत, गजानन नाईक, सागर चव्हाण, माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, कणकवली सभापती सौ. हर्षदा वाळके, जिल्हा परिषद सदस्य सौ. सुप्रिया वालावलकर, विकास डॉक्टर दिनेश नाईक, केतकी वझे, आर्किटेक्चर माने व पदाधिकारी, पत्रकार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सोहळ्याचे औचित्य साधून पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह देऊन विशेष गौरवही करण्यात आला.

यावेळी बोलताना पालकमंत्री नितेश राणे यांनी पत्रकारांविषयीची आपली विशेष आत्मीयता व्यक्त करत हा गृहनिर्माण प्रकल्प संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी एक आदर्श प्रकल्प ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. ते पुढे म्हणाले की, या कार्यक्रमाचे निमंत्रण ज्येष्ठ नेते नारायण राणे साहेबांनाही देण्यात आले होते. मात्र, मीच त्यांना सांगितले की, आपण भूमिपूजनाला येण्याऐवजी जेव्हा पत्रकार मित्रांना त्यांच्या हक्काच्या घरांच्या चाव्या दिल्या जातील, त्या मुख्य सोहळ्याला उपस्थित राहावे; कारण पत्रकारांबद्दल राणेसाहेबांच्या मनात नेहमीच जिव्हाळा राहिला आहे. कोणताही मोठा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी प्रबळ इच्छाशक्ती आणि प्रशासनाची सकारात्मक भूमिका अत्यंत महत्त्वाची असते, असे सांगत त्यांनी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या गतिमान कार्यपद्धतीचे विशेष कौतुक केले. आई-वडिलांचे संस्कार आणि राणेसाहेबांनी दिलेल्या शिकवणीमुळेच निर्णय घेताना नेहमी माणुसकी डोळ्यासमोर ठेवण्याची सवय लागल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.

आपल्या भाषणात पुढे बोलताना पालकमंत्री म्हणाले की, आमच्याकडे आउटगोइंग फ्री आहे आणि इनकमिंग पूर्णपणे बंद आहे, म्हणजेच लोकांकडून काही घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. वाडी-वस्त्यांपासून ते वंचित समाजापर्यंतच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कठीण आणि अशक्य वाटणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही थेट लक्ष घालत आहोत. हा सिंधूदर्पण प्रकल्प अतिशय उत्कृष्ट दर्जासह आणि विहित वेळेत पूर्ण होईल, कारण माझ्या प्रत्येक प्रकल्पावर माझे वैयक्तिक बारीक लक्ष असते. आज जरी या प्रकल्पाचे भूमिपूजन झाले असले, तरी लवकरच बांधकाम पूर्ण करून घरांच्या चाव्या सुपूर्द करण्याचा भव्य कार्यक्रम आयोजित केला जाईल आणि या गृहप्रवेश सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ज्येष्ठ नेते नारायण राणे उपस्थित राहतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
याप्रसंगी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी प्रकल्पाच्या प्रशासकीय वाटचालीची माहिती देताना सांगितले की, काही तांत्रिक कारणांमुळे हा प्रकल्प काही काळ रखडला होता, मात्र २०२३-२४ नंतर या प्रक्रियेला गती मिळाली. संस्थेने १२ डिसेंबर २०२५ रोजी आवश्यक रक्कम जमा केल्यानंतर ५ जानेवारी २०२६ रोजी जागावाटपाचा आदेश देण्यात आला, तर १५ एप्रिल २०२६ रोजी सुधारित आदेशही जारी करण्यात आला. राज्यातील कोणत्याही जिल्ह्यात पत्रकारांसाठी अद्याप अशा प्रकारचा भव्य प्रकल्प उभारण्यात आलेला नाही, त्यामुळे सिंधुदुर्ग हा राज्यातील पहिला जिल्हा ठरत आहे. पालकमंत्री प्रत्येक क्षेत्रात सिंधुदुर्ग जिल्ह्याला आघाडीवर ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असून हा प्रकल्प त्याचाच एक भाग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमात बोलताना मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी या प्रकल्पाचे संपूर्ण श्रेय पालकमंत्री नितेश राणे यांना दिले. हा प्रकल्प राज्यासाठी दिशादर्शक आणि आदर्श ठरेल तसेच यामुळे पत्रकारांचे अनेक वर्षांचे हक्काच्या घराचे स्वप्न साकार होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी पत्रकारांच्या एकजुटीचे कौतुक करताना सांगितले की, सिंधुदुर्गातील पत्रकार केवळ व्यावसायिक नात्याने नव्हे तर एका कुटुंबाप्रमाणे एकत्र जोडले गेले आहेत. या प्रकल्पामुळे अनेक पत्रकार कुटुंबांना हक्काचे घर मिळणार असून हा उपक्रम निश्चितच मार्गदर्शक ठरेल. या संपूर्ण कार्यक्रमाचे प्रास्ताविक गृहनिर्माण प्रकल्पाचे चेअरमन संतोष राऊळ यांनी केले, तर पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर यांनी माहिती दिली आणि गणेश जेठे यांनी प्रास्ताविक व आभार मानले.



