सावंतवाडी,दि.१३: सावंतवाडी-बेळगाव महामार्गावर आज सकाळी माडखोल फुगी परिसरात एका चारचाकी गाडीला भीषण अपघात झाला. सावंतवाडीहून कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या या कारचा अपघात वळणाचा अंदाज न आल्याने झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी १३ तारखेला एक चारचाकी गाडी सावंतवाडीहून बेळगाव महामार्गावरून कोल्हापूरच्या दिशेने जात होती. माडखोल फुगी परिसरात असलेल्या पुलाजवळ रस्ता अत्यंत वळणदार आहे. या ठिकाणी पोहोचल्यानंतर चालकाला वळणाचा अंदाज आला नाही, ज्यामुळे त्याचा गाडीवरील ताबा पूर्णपणे सुटला आणि गाडी सुमारे आठ ते दहा फूट रस्ता सोडून खाली कोसळली.
या अपघाताची माहिती वैभव घावरे यांनी दिली.
स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदत कार्य केले.
ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात इतका भीषण होता की कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र, सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि चालक व प्रवासी सुखरूप बचावले आहेत. या मार्गावर अनेक ठिकाणी धोकादायक वळणे असल्याने नवीन चालकांना रस्ता समजण्यास अडचण येते, त्यातूनच हा अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. महामार्गावरील या वाढत्या अपघातांमुळे वाहनचालकांनी अधिक सतर्क राहून वाहने चालवावीत, असे आवाहन स्थानिक ग्रामस्थांकडून केले जात आहे.



