आमदार दीपक केसरकर यांच्या पाठपुराव्यामुळे सिंधुदुर्गातील रुग्णांना मोठा दिलासा
सावंतवाडी, दि.११: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांची गैरसोय दूर करण्यासाठी एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण पाऊल उचलले जात आहे. माजी शालेय शिक्षण मंत्री तथा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे तसेच युवा रक्तदाता संघटना यांच्या मागणीमुळे सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात धारगळ येथील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानचे केंद्र (उप-केंद्र) सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या केंद्रामुळे रुग्णांना मोफत औषधोपचार मिळणार आहे.
आयुर्वेदिक संस्थानाचे संचालक डॉ. प्रजापती यांनी याबाबत माहिती दिली. आमदार केसरकर यांनी ४ नोव्हेंबर २०२५ रोजी अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान, दिल्ली येथे दिलेल्या पत्रानुसार आणि केलेल्या पाठपुराव्यानुसार हे मोठे यश मिळाले आहे. सावंतवाडी येथे केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव स्थानिक पातळीवर मंजूर करून दिल्ली येथील वरिष्ठ कार्यालयाला पाठवण्यात आला आहे. यावर नक्कीच सकारात्मक विचार होईल, असा विश्वास डॉ. प्रजापती यांनी व्यक्त केला. ते आयुर्वेद संस्थानच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांच्या समवेत डॉ. सुजाता कदम, डॉ. विनायक चकोर आदी उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी असल्यामुळे येथील रुग्णांना जिल्ह्यातच ही सेवा मिळावी, यासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात हे उपकेंद्र सुरू करण्याची योजना आहे. या केंद्रासाठी डॉक्टर, फार्मासिस्ट आणि अन्य कर्मचारी यांच्या नियुक्तीसंदर्भातील प्रस्तावही सादर करण्यात आला आहे. वरिष्ठांकडून मंजुरी मिळाल्यानंतर उपजिल्हा रुग्णालयाशी करार करून हे केंद्र लवकरच सुरू केले जाईल, मात्र यासाठी थोडा अवधी लागणार असल्याचे डॉ. प्रजापती यांनी नमूद केले.
आमदार दीपक केसरकर यांच्या पाठपुराव्याला हे मोठे यश मिळाले असून येथील रुग्णांची मोठी गैरसोय यामुळे दूर होणार आहे. आमदार दीपक केसरकर यांच्यासह युवा रक्तदाता संघटनाचे संस्थापक अध्यक्ष देव्या सूर्याजी यांनी सातत्याने याकरिता प्रयत्न केले. तसेच, धारगळ येथील संस्थानात कार्यरत असलेले भूमिपुत्र, पंचकर्म थेरपिस्ट तथा शिवसेना शाखाप्रमुख गौरव कुडाळकर यांनीही वेळोवेळी सदर पाठपुरावा आयुर्वेद संस्थानकडे केला आहे.



