सावंतवाडी,दि.१२ : लग्न जुळवाजुळव करताना भावनांचा विचार न करता भौतिक सुविधांचा उहापोह केला जातो. त्यामुळे लग्नाच्या स्वप्नांना तडा जाण्याची शक्यता असते त्यामुळे अखिल भारतीय मराठा महासंघ वधुवर सुचक मंडळाच्या माध्यमातून समुपदेशन करून लग्नाची यशस्वी गाठ बांधण्यासाठी प्रयत्नशील आहे, असा विश्वास अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष अँड सुहास सावंत यांनी व्यक्त केला.
अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने सावंतवाडी येथे वधुवर सुचक मेळावा आयोजित केला होता त्यावेळी अँड सावंत बोलत होते. यावेळी अर्चना फाऊंडेशन अध्यक्षा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोकण महिला अध्यक्षा सौ अर्चना घारे परब, सावंतवाडी मराठा समाज अध्यक्ष सिताराम गावडे, दोडामार्गचे उदय पास्ते, वेंगुर्लेचे मनोहर येरम, अभिमन्यू लोंढे, जिल्हा कार्यालय प्रमुख रवींद्र राऊळ, पुंडलिक दळवी,पुजा दळवी, धोंडी दळवी, संग्राम सावंत, व मान्यवर उपस्थित होते.
सौ अर्चना घारे परब म्हणाल्या, मराठा समाजासाठी प्रेरणादायी योगदान दिले जात आहे. नोकऱ्या नाहीत पण लग्न जुळवाजुळव करताना भौतिक मागण्या वाढत आहेत. अँड सुहास सावंत प्रेरणादायी योगदान देत आहेत. आम्ही यशवंतराव चव्हाण सेंटर सुरू केले आहे. या कार्यालयातून देखील सेवा दिली जात आहे. जरूर ते सहकार्य करण्याची भूमिका आम्ही ठेवली आहे.
अँड सुहास सावंत म्हणाले, मराठा समाजाचे काम करताना समाजातील विविध समस्या येऊ लागल्या त्यात लग्न विषय आला. त्यामुळे वधुवर सुचक मंडळ करण्याची संकल्पना मांडली. लग्न जुळले, तेव्हा योग्य चौकशी केली नाही तर स्वप्नभंग होवू शकतो त्यामुळे वधुवर सुचक मेळावा आयोजित करून नोंद करून योग्य स्थळ शोधले जाईल. लग्न जुळवाजुळव करताना चुकीच्या आशादायी प्रयत्नांमुळे अडचणी येतात. त्यासाठी विवाह समुपदेशक केले जाईल त्यामुळे कुरबुरी होणार नाहीत. लग्न जुळवाजुळव करताना भौतिक सुविधा बाबत पाहिले जाते. जोडीदार निवडताना भौतिक सुविधा बाबत विचार करत बसु नये.तसेच मराठा उद्योजक यादी बनवून समाजासाठी मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. आर्थिक विकास महामंडळ योजना समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केला जातो. याशिवाय करिअर मेळावा घेण्यात येणार आहे.
यावेळी सिताराम गावडे म्हणाले, समाजातील विविध समस्या सोडविण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून नेहमीच प्रयत्नशील आहोत. समाजातील समस्या ऐकून त्यावर उपाय शोधण्यासाठी गावागावात जाऊन गाव तेथे मराठा समाज शाखा निर्माण झाली पाहिजे म्हणून प्रयत्न केला जाईल. लग्न जुळवाजुळव करताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजेत. समाजीत सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचण्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करू.
यावेळी जिल्हा कार्यालय प्रमुख रवींद्र राऊळ यांनी वधुवर सुचक मेळावा बाबत माहिती दिली तर अर्चना घारे परब यांच्या हस्ते दिपप्रज्वलन तर अँड सुहास सावंत यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. कुडाळ आणि सावंतवाडी येथे सुमारे १५० वधुवर सुचक नोंदणी झाली आहे असे रवींद्र राऊळ यांनी सांगितले.