Home News RBSK पथकाचा निष्काळजीपणा; मळेवाड-कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे उपोषणाच्या तयारीत

RBSK पथकाचा निष्काळजीपणा; मळेवाड-कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे उपोषणाच्या तयारीत

0
1

सावंतवाडी,दि.२४: शासनाचा अत्यंत महत्त्वाकांक्षी उपक्रम असलेल्या ‘राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमा’चा (RBSK) मळेवाड-कोंडुरे गावात अक्षरशः फज्जा उडाला असून आरोग्य यंत्रणेच्या भोंगळ कारभारामुळे शेकडो चिमुकली आरोग्याच्या तपासणीपासून वंचित राहिल्याचा अत्यंत गंभीर प्रकार समोर आला आहे. जन्मापासून ते १८ वर्षे वयोगटातील मुलांच्या मोफत आरोग्य तपासणीची आणि उपचारांची जबाबदारी असलेल्या या योजनेचा जिल्ह्यात पुरता बोजवारा उडाला आहे. आरोग्य यंत्रणेच्या या मनमानी आणि बेजबाबदार कारभाराविरोधात मळेवाड-कोंडुरेचे उपसरपंच हेमंत मराठे यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, थेट ओरोस येथील जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयासमोर गावातील लहान मुले आणि पालकांसह उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.

जन्माच्या वेळचे दोष, विविध आजार, शारीरिक कमतरता आणि विकासातील विलंब या मुख्य घटकांवर मात करण्यासाठी राष्ट्रीय बाल स्वास्थ अभियानांतर्गत वर्षातून किमान एकदा तरी प्रत्येक अंगणवाडीतील मुलांची तपासणी होणे अनिवार्य असते. मात्र, मळेवाड-कोंडुरे गावातील अंगणवाड्यांचा विचार केला असता, गेल्या दीड वर्षापासून अनेक मुलांची साधी प्राथमिक तपासणीही झालेली नाही. तपासणी पथक वेळेवर येत नसल्यामुळे आणि नियोजनाचा पूर्णपणे अभाव असल्यामुळे गावभरातील अनेक बालके या महत्त्वाच्या शासकीय योजनेच्या लाभापासून वंचित राहिली आहेत.

शुक्रवारी मळेवाड गावातील दोन अंगणवाड्यांमध्ये तपासणीसाठी RBSK चे पथक येणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे लहान मुलांसह त्यांचे पालक सकाळपासून अंगणवाडीत पथकाची वाट पाहत ताटकळत बसले होते. मात्र, दुपारचे १२ वाजले तरी आरोग्य पथकाचा कोणताही पत्ता नव्हता. अखेर उपसरपंच हेमंत मराठे यांनी स्वतः पथकातील डॉक्टरांशी संपर्क साधला असता, आमच्याकडे गाडी उपलब्ध नाही, खाजगी वाहनाने यावे लागत असल्याने उशीर होत आहे, असे उडवाउडवीचे उत्तर डॉक्टरांकडून देण्यात आले. आरोग्य पथकासारख्या अत्यावश्यक सेवेसाठी गाडी नसेल आणि त्यामुळे मुलांची तपासणी होत नसेल, तर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा खरोखरच सलाईनवर आहे की काय, असा उद्विग्न सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

या संपूर्ण प्रकारामुळे आरोग्य विभागाच्या ढिसाळ कारभारावर कडक ताशेरे ओढले जात असून, जिल्हा शल्यचिकित्सकांनी या प्रकरणी त्वरित लक्ष देणे गरजेचे बनले आहे. या पथकाने आतापर्यंत प्रत्यक्षात किती मुलांची तपासणी केली, किती बालकांना औषधोपचार पुरवले, तसेच अपंगत्व किंवा जन्मजात गंभीर आजार असलेल्या किती मुलांवर कोणते उपचार केले, या सर्व बाबींची खातरजमा करून कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. जर या रामभरोसे चाललेल्या यंत्रणेत तात्काळ सुधारणा झाली नाही, तर सिंधुदुर्गनगरी ओरोस येथील जिल्हा शल्यचिकित्सकांच्या कार्यालयासमोर मुलांसह धरणे आंदोलन व उपोषण छेडण्याचा इशारा उपसरपंच हेमंत मराठे यांनी दिल्याने आरोग्य वर्तुळात खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here