Home News ‘सकाळ’चे बांदा प्रतिनिधी नीलेश मोरजकर यांना मुंबईत ‘निर्भीड पत्रकार सन्मान’ पुरस्कार जाहीर

‘सकाळ’चे बांदा प्रतिनिधी नीलेश मोरजकर यांना मुंबईत ‘निर्भीड पत्रकार सन्मान’ पुरस्कार जाहीर

0
3

२३ वर्षांच्या वस्तुनिष्ठ पत्रकारितेची राज्यस्तरावर दखल; १२ जुलैला दादर येथे होणार गौरव सोहळा

सावंतवाडी,दि.२८: दैनिक ‘सकाळ’चे बांदा येथील प्रतिनिधी नीलेश मोरजकर यांच्या निर्भीड, वस्तुनिष्ठ आणि जनहिताच्या पत्रकारितेची पुन्हा एकदा राज्यस्तरावर दखल घेण्यात आली आहे. ‘आर्यारवी एंटरटेनमेंट’च्या वतीने आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात त्यांना यंदाचा प्रतिष्ठित ‘निर्भीड पत्रकार सन्मान’ पुरस्कार जाहीर झाला आहे. पत्रकार, समाजसेवक, साहित्यिक आणि कलावंतांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्याचे वितरण रविवार, दिनांक १२ जुलै रोजी सकाळी ९.३० वाजता मुंबईतील दादर (पूर्व) येथील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या सुरेंद्र गावस्कर हॉलमध्ये मान्यवरांच्या हस्ते संपन्न होणार आहे.

अभिनय, दिग्दर्शन आणि पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे महेश्वर तेटांबे यांच्या संकल्पनेतून या भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील पत्रकार, मुक्त वार्ताहर, साप्ताहिक व पाक्षिकांचे प्रतिनिधी तसेच डिजिटल माध्यमातील पत्रकारांच्या वैशिष्ट्यपूर्ण कार्याला व्यासपीठ मिळवून देणे हा या सोहळ्याचा मुख्य उद्देश आहे. या सोहळ्यात ‘निर्भीड पत्रकार सन्मान’ या पुरस्कारासोबतच ‘स्वाभिमान लेखणी’, ‘शब्दवेध गौरव’, ‘अजेय लेखणी’ आणि ‘कलम-रत्न’ अशा विविध राज्यस्तरीय पुरस्कारांचेही वितरण करण्यात येणार आहे.

गेली तेवीस वर्षे पत्रकारिता क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेल्या श्री. मोरजकर यांनी आपल्या निर्भीड, निःपक्ष आणि जनहिताच्या पत्रकारितेमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक वेगळी व स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. सामाजिक प्रश्नांना थेट वाचा फोडणे, ग्रामीण भागातील सर्वसामान्यांच्या समस्या आणि प्रशासकीय त्रुटी शासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे, तसेच विकासात्मक विषयांना लेखणीत सातत्याने प्राधान्य देणे ही त्यांच्या पत्रकारितेची मुख्य वैशिष्ट्ये मानली जातात.

पत्रकारितेच्या पलीकडे जाऊन त्यांनी सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रातही आपले उल्लेखनीय योगदान दिले आहे. जिल्ह्यातील रक्तदान चळवळीत त्यांचा नेहमीच सक्रिय सहभाग राहिला असून, ते ‘श्री स्वराज्य प्रतिष्ठान, बांदा’ या संस्थेचे अध्यक्ष म्हणून धुरा सांभाळत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली शिवजयंतीनिमित्त अनेक नावीन्यपूर्ण आणि समाजोपयोगी उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आले आहेत. याशिवाय ते नट वाचनालय, बांदा चे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत असून, बांदा मराठा समाजाचे संस्थापक म्हणूनही त्यांनी समाज संघटन आणि सामाजिक उपक्रमांत मोलाची भूमिका बजावली आहे.

श्री. मोरजकर यांच्या या लोकविमुख कार्याची यापूर्वीही राष्ट्रीय आणि राज्य स्तरावर दखल घेण्यात आली आहे. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते त्यांना राष्ट्रीय स्तरावरील ‘भास्कर भूषण अवॉर्ड’ प्रदान करण्यात आला होता. तसेच ब्लू स्टार सामाजिक व बहुउद्देशीय संस्था (पंढरपूर) यांच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार, ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळ (सावंतवाडी) चा जिल्हास्तरीय उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार, तसेच सिंधुदुर्ग जिल्हा प्रेस क्लबचा अत्यंत मानाचा ‘दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर आदर्श पत्रकार पुरस्कार’ यांसह अनेक पुरस्कार त्यांनी पटकावले आहेत. आता जाहीर झालेल्या ‘निर्भीड पत्रकार सन्मान’ पुरस्कारामुळे त्यांच्या यशाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, सिंधुदुर्गसह राज्यभरातील पत्रकार, सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here