सावंतवाडीतील प्रलंबित प्रकल्प पूर्ण करण्यावर भर, मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा प्रश्न गुरुवारी मार्गी लागणार; कार्यकर्त्यांचे केसरकरांना पुन्हा मंत्रीपद मिळण्यासाठी साईचरणी गाऱ्हाणे
सावंतवाडी,दि.२८: गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सालाबादप्रमाणे प्रतिशिर्डी येथील श्री साई पालखीचे आगमन आमदार दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी झाले. या प्रसंगी आमदार दीपक केसरकर आणि त्यांच्या पत्नी सौ. पल्लवी केसरकर यांच्या हस्ते श्री साईबाबांच्या पादुकांचे भावपूर्ण पूजन करण्यात आले. या पालखी सोहळ्यादरम्यान उपस्थित कार्यकर्त्यांनी आणि साईभक्तांनी आमदार केसरकर यांना पुन्हा मंत्रीपद मिळावे, असे साकडे साईबाबांच्या चरणी घातले.
या सोहळ्यानंतर पत्रकारांशी बोलताना आमदार दीपक केसरकर यांनी साईबाबांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. साईबाबांनी न मागता मला सर्वकाही दिले आहे. चार वेळा आमदार आणि मंत्री होण्याचे भाग्य लाभले, तसेच लोकांचे उदंड प्रेम कमावता आले. त्यामुळे आता या जनतेसाठीचे प्रलंबित प्रकल्प पूर्ण करण्यावरच माझा मुख्य भर आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. सावंतवाडीतील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे शपथपत्र गुरुवारी सादर होणार असून हा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. यासंदर्भात आजच्याच दिवशी भोगले घराण्याशी सकारात्मक चर्चा झाल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच मंत्रीपद मिळण्याबाबत कार्यकर्त्यांची इच्छा असली, तरी त्याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या कामगिरीचा गौरव करताना श्री. केसरकर म्हणाले की, या रुग्णालयाने विभागात दुसरा क्रमांक पटकावला असून भविष्यात हे २०० खाटांचे सर्वोत्कृष्ट रुग्णालय ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गुरुपौर्णिमेच्या औचित्याने शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या समाधीस्थळी जाऊन नमन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पक्षाचे नेते एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून प्रेरणा घेत हिंदुत्वाच्या गुरूंना वंदन करणार असल्याचे सांगतानाच, राजकारणात विचारधारेला अनन्यसाधारण महत्त्व असते. बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेली हीच विचारधारा आज भारताला जगभरात एक बलाढ्य राष्ट्र म्हणून ओळख मिळवून देत आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
या पालखी पूजन व दर्शन सोहळ्याला माजी नगराध्यक्षा पल्लवी केसरकर, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, ज्येष्ठ नेते अशोक दळवी, तालुकाप्रमुख दिनेश गावडे, शहरप्रमुख बाबु कुडतरकर, महिला जिल्हाप्रमुख ॲड. निता सावंत-कविटकर आणि सुधा कवठणकर यांच्यासह शिवसेनेचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.



