२१ विद्यार्थी ठरले पात्र; गुणवंत विद्यार्थ्यांचा शाळेत भव्य नागरी सत्कार
सावंतवाडी,दि.१३: प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत (इयत्ता चौथी) सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचालित कळसुलकर प्राथमिक शाळेने आपल्या उत्कृष्ट शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा कायम राखत दैदिप्यमान यश संपादन केले आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात या शाळेचे तब्बल २१ विद्यार्थी पात्र ठरले असून, त्यातील चार विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत मानाचे स्थान मिळवून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
जिल्हा गुणवत्ता यादीत चमकदार कामगिरी करणाऱ्या
विद्यार्थ्यांमध्ये
कुमारी धारा महेंद्र कोरगावकर हिने जिल्ह्यात १४ वा क्रमांक पटकावला आहे. तर कुमार वेद गोपाळ गवस
याने २६ वा, कुमार चैतन्य प्रदीप सावंत
याने २८ वा आणि कुमार कृष्णा उमेश पायशेठ
याने ५० वा क्रमांक मिळवून यश संपादन केले. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा शाळेच्या सभागृहात आयोजित विशेष सोहळ्यात भेटवस्तू देऊन यथोचित गौरव करण्यात आला.
या कौतुक सोहळ्याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे सचिव डॉ. प्रसाद नार्वेकर, संचालक श्री. स्वार, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष श्री. प्रसाद गोठोस्कर, माध्यमिक मुख्याध्यापक श्री. भुरे सर, प्राथमिक मुख्याध्यापक श्री. प्रदीप सावंत सर यांच्यासह शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ. प्रसाद नार्वेकर यांनी, “कळसुलकर शाळा म्हणजे गुणवत्तेची खाण आहे. प्राथमिक स्तरावर विद्यार्थ्यांनी मिळविलेले हे यश त्यांच्या उज्ज्वल भविष्याची नांदी आहे,” अशा शब्दांत विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
विद्यार्थ्यांच्या या यशामागे मार्गदर्शक शिक्षक श्री. डी. जी. वरक आणि सौ. स्मिता घाडीगावकर यांचे मोलाचे परिश्रम व मार्गदर्शन लाभले. तसेच शिक्षक अमित कांबळे, ज्योत्स्ना गुंजाळ, प्राची बिले, स्वरा राऊळ आणि संजना आडेलकर यांचेही महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले. २१ विद्यार्थ्यांची पात्रता आणि चार विद्यार्थ्यांचे जिल्हा गुणवत्ता यादीतील यश यामुळे कळसुलकर प्राथमिक शाळेच्या गुणवत्तेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले असून, संपूर्ण सावंतवाडी तालुक्यातून या गुणवंतांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



