जेलच्या पाठीमागे रिक्षा खड्ड्यात रुतली; दोन दिवसांपूर्वी एसटी बसचाही झाला होता खोळंबा
सावंतवाडी,दि.१०: “विकास हवाय, पण नागरिकांच्या जिवावर बेतणारा नको!” अशीच काहीशी संतप्त भावना सध्या प्रत्येक सावंतवाडीकराच्या मनात निर्माण झाली आहे. शहरात गॅस पाईपलाईन टाकण्याचे काम करणाऱ्या MNGL कंपनीच्या नियोजनशून्य आणि बेफिकीर कारभारामुळे सध्या संपूर्ण सावंतवाडी शहर खड्डेमय झाले असून, हे खड्डे आता वाहनचालकांसाठी थेट मृत्यूचे सापळे ठरत आहेत. पावसाळ्याच्या तोंडावर केलेल्या या निष्काळजीपणामुळे शहरात अपघातांची मालिका सुरू झाली असून, प्रशासनाच्या ढिम्म भूमिकेवर आता जनतेतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
दोन दिवसांपूर्वीच वन विभागाच्या कार्यालयासमोर एक एस.टी. बस या खोदलेल्या खड्ड्यात अडकली होती, ज्यामुळे शहरातील वाहतुकीचा तासनतास खोळंबा झाला होता. या मोठ्या प्रसंगानंतर तरी MNGL कंपनीला जाग येईल अशी नागरिकांची अपेक्षा होती. मात्र, कंपनी प्रशासनाला याचे काहीच सोयरसुतक नसल्याचे आज पुन्हा एकदा सिद्ध झाले. आज जेलच्या पाठीमागील रस्त्यावर एक ऑटो रिक्षा थेट खड्ड्यात रुतली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र रिक्षा बाहेर काढताना चालक आणि प्रवाशांची मोठी ओढाताण झाली. हे लागोपाठ होणारे अपघात म्हणजे MNGL च्या ढिसाळ आणि बेजबाबदार कामाचे जिवंत पुरावे ठरत आहेत.
शहरातील विविध मुख्य रस्ते आणि अंतर्गत गल्ल्यांमध्ये पाईपलाईनसाठी मोठे खड्डे खणण्यात आले आहेत. काम झाल्यानंतर हे रस्ते व्यवस्थित बुजवणे गरजेचे असताना, कंपनीने फक्त माती टाकून हात वर केले आहेत. पहिल्याच पावसात या खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने वाहनधारकांना रस्त्याचा आणि खड्ड्यांच्या खोलीचा अजिबात अंदाज येत नाहीये. यामुळे दुचाकीस्वार घसरून पडत असून रिक्षा आणि चारचाकी वाहने चिखलात व खड्ड्यात फसण्याचे प्रमाण वाढले आहे. तर दुसरीकडे पायदळ चालणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांच्या सुरक्षेचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. एखादा गंभीर अपघात घडून निष्पाप नागरिकाचा बळी गेल्यानंतरच प्रशासन आणि कंपनीला जाग येणार का, असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
विशेष म्हणजे, खोदकाम केलेले रस्ते तातडीने पूर्ववत करण्याची कायदेशीर जबाबदारी संबंधित कंपनीची असते. मात्र, सावंतवाडीकरांच्या पदरी सध्या फक्त कंपनीच्या आश्वासनांची खैरात पडत असून प्रत्यक्षात जमिनीवर कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नाही. “काम जरूर करा, पण लोकांच्या जिवाशी खेळू नका,” अशी तीव्र प्रतिक्रिया सावंतवाडीकर व्यक्त करत आहेत. गॅस पाईपलाईनच्या विकासापेक्षा नागरिकांचा जीव महत्त्वाचा असून MNGL ने केलेल्या रस्त्यांच्या विद्रूपीकरणाचा हिशोब कोण देणार, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. संबंधित वरिष्ठ यंत्रणांनी या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून धोकादायक खड्डे बुजवून घ्यावेत आणि MNGL कंपनीला कडक शब्दांत जाब विचारावा, अशी जोरदार मागणी आता सावंतवाडीकरांमधून केली जात आहे.



