सावंतवाडी,दि.२५: तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे झालेल्या मोठ्या नुकसानीची पाहणी सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केली. यावेळी तहसीलदार श्रीधर पाटील यांनी नुकसानीची प्राथमिक माहिती दिली असून जवळपास ६१ ठिकाणी मोठे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. या संकटकाळात शासन जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, केवळ शासकीय निकषानुसारच नव्हे, तर प्रसंगी चौकटीबाहेर जाऊन लोकांना आधार दिला जाईल आणि जिल्हाधिकारी व प्रशासनाशी चर्चा करून जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून दिली जाईल, असे आश्वासन पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.
पालकमंत्री नितेश राणे यांनी येथील श्री पंचम खेमराज महाविद्यालय व रामेश्वर प्लाझा येथे वादळी वाऱ्याने झालेल्या पडझडीची प्रत्यक्ष पाहणी केली. नुकसानीचा सविस्तर अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश त्यांनी तहसीलदारांना दिले. यावेळी बोलताना मंत्री राणे म्हणाले की, आमदार दीपक केसरकर, नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर व त्यांची संपूर्ण टीम जनतेला दिलासा देण्यासाठी प्रयत्नशील आहे. जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी नद्यांमधील गाळ काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, काढलेल्या गाळाचे नियोजन करण्याचे धोरणही निश्चित करण्यात आले आहे. गेल्यावर्षीप्रमाणे यावर्षीही पूर रोखण्यासाठी सर्व उपाययोजना केल्या जात असून, प्रशासकीय कामात समन्वय राखण्यावर आपला भर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पावसाळ्यापूर्वीच्या तयारीचा आढावा घेताना त्यांनी सांगितले की, धोकादायक झाडांसह इतर समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाची टीम तैनात करण्यात येत आहे. महावितरणच्या कामातही सुधारणा होत असून, ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून जिल्ह्याला मोठा निधी प्राप्त झाला आहे. वीज वाहिन्या भूमिगत करण्यासाठी प्रयत्न सुरू असून टप्प्याटप्प्याने सर्व तांत्रिक समस्या दूर केल्या जातील. तसेच, बाधित शेतकऱ्यांना निकषात बसवून जास्तीत जास्त आर्थिक मदत पोहचवली जाईल.
शक्तीपीठ महामार्गाबाबत सुरू असलेल्या चर्चांवर स्पष्टीकरण देताना पालकमंत्र्यांनी सांगितले की, आमदार दीपक केसरकर यांनी केलेल्या सूचनांची दखल घेत नवीन मार्ग निश्चित करण्यात आला आहे. यामुळे बांदा व इतर गावे बाधित होणार नाहीत आणि हा मार्ग रेडी पोर्टला जोडला जाणार असल्याने जिल्ह्याच्या विकासाला गती मिळेल. राज्य सरकार अफवांवर नाही तर विकासाच्या धोरणावर चालत असून शक्तीपीठ मार्गाचा फायदा जिल्ह्यालाच होईल, असे त्यांनी नमूद केले. आरोग्य सुविधेबाबत बोलताना त्यांनी माहिती दिली की, सावंतवाडी रुग्णालयासाठी एमडी फिजिशियनची नियुक्ती करण्यात आली असून, एप्रिल ते जून दरम्यान आरोग्य विभागातील इतर सर्व रिक्त पदे भरली जातील.

या पाहणी दौऱ्यावेळी आमदार दीपक केसरकर, नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, युवराज लखमराजे भोसले, तहसीलदार श्रीधर पाटील, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, जि.प. सदस्य विक्रांत सावंत, प्राचार्य डी.एल. भारमल यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते.




