सावंतवाडी,दि.२२: इन्सुली माडभाकरवाडी येथे महावितरणच्या दुर्लक्षामुळे ११ केव्ही उच्चदाब विद्युत वाहिनी तुटून झालेल्या शॉर्ट सर्किटमध्ये शेतकरी गोविंद कृष्णा आमडोसकर यांच्या गवताच्या गंजी जळून खाक झाल्या. आज सायंकाळी ४:०० वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेत शेतकऱ्याचे सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेनंतर महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी मदतीसाठी टाळाटाळ करत ‘धातूर-मातूर’ उत्तरे दिल्याने स्थानिकांमध्ये संताप व्यक्त होत होता. मात्र, जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ यांनी घटनास्थळी धाव घेत आक्रमक पवित्रा घेतल्याने अखेर शेतकऱ्याला जागीच २५ हजार रुपयांची रोख भरपाई देण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी नितीन राऊळ यांना पाचारण केले होते. यावेळी राऊळ यांनी अत्यंत कडक भूमिका घेत जोपर्यंत संबंधित शेतकऱ्याला नुकसान भरपाई दिली जात नाही, तोपर्यंत महावितरणच्या एकाही कर्मचाऱ्याने विद्युत खांबावर चढू नये किंवा वीज पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न करू नये, असा सज्जड दम दिला. वारंवार सूचना देऊनही महावितरण दुर्लक्ष करत असल्याचे सांगत त्यांनी कार्यकारी अभियंता श्री. वनमोरे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. राऊळ यांनी आक्रमक इशारा दिल्यानंतर महावितरण प्रशासनाने नमती भूमिका घेतली आणि पीडित शेतकऱ्याला तातडीने २५ हजार रुपये रोख स्वरूपात भरपाई म्हणून दिले.
भरपाई मिळाल्यानंतर सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास संपूर्ण पंचक्रोशीतील विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला. यावेळी बोलताना नितीन राऊळ यांनी महावितरणला कडक शब्दांत सुनावले. परिसरातील जीर्ण विद्युत खांब आणि तारांची तातडीने दुरुस्ती करा, अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला. या संदर्भात उद्याच कार्यकारी अभियंत्यांची भेट घेऊन निवेदन देण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

याप्रसंगी महावितरणचे कनिष्ठ अभियंता श्री. ठाकूर, इन्सुली क्षेत्रफळ पोलीस पाटील श्रीम. प्रिया कोठावळे, हेमंत नाईक, आप्पा आमडोसकर, कृष्णा कोठावळे, महेश धुरी, संदीप कोठावळे, बांदा ग्रामपंचायत सदस्य राजाराम सावंत, जावेद खतीब, तसेच ज्ञानेश्वर सावंत, रामचंद्र कोठावळे, प्रशांत वारंग, सुजय कोठावळे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



