आमच्या घराण्याची चौथी पिढी सद्गुरूंच्या चरणी लीन; पुण्यतिथी उत्सवानिमित्त सावंतवाडीत भाविकांची मांदियाळी
सावंतवाडी,दि.१०: वेंगुर्ला नगरपालिकेचे नगराध्यक्ष राजन गिरप यांनी आज आपल्या कुटुंबीयांसह सावंतवाडी येथील सद्गुरू श्री मियांसाहेब यांच्या समाधीस्थानाला भेट देऊन समाधीचे मनोभावे दर्शन घेतले आणि कुटुंबाच्या वतीने सद्गुरूंच्या चरणी नतमस्तक झाले. सद्गुरू श्री मियांसाहेब यांच्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी ही भेट घेतली. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नगराध्यक्ष राजन गिरप यांनी सद्गुरू मियांसाहेबांविषयीची आपल्या कुटुंबाची अनेक दशकांची अखंड श्रद्धा अधोरेखित केली. आमच्या घराण्याच्या चौथ्या पिढीपर्यंत सद्गुरू मियांसाहेबांवरील श्रद्धा कायम असून, त्यांच्या आशीर्वादामुळेच आमच्या कुटुंबाला सदैव बळ आणि प्रेरणा मिळत आली आहे, असे सांगत प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात आम्ही सद्गुरूंच्या दर्शनानेच करतो, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. हा आमच्या घराण्याचा संस्कार असल्याचे सांगून त्यांनी समाधीस्थळाच्या विकासासाठीही सहकार्य करण्याची भूमिका स्पष्ट केली.

समाधीस्थानी पार पडलेल्या या मुख्य कार्यक्रमात संपूर्ण परिसरात अत्यंत भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. यावेळी गिरप कुटुंबीयांसह अनेक मान्यवर आणि शेकडो भाविकांनी भक्तिभावाने सद्गुरूंचे दर्शन घेत प्रार्थना केली. या सोहळ्याप्रसंगी प. पू. सद्गुरू मियांसाब भक्त मंडळाचे अध्यक्ष वसंत राणे, उपाध्यक्ष सतीश शिरोडकर, सरचिटणीस दत्तप्रसाद अरविंददेकर, खजिनदार शैलेश पै, सहचिटणीस उमेश कोरगावकर, सदस्य सुभाष स्वार, ऋतुराज शिर्के, सदानंद पडते, साईप्रसाद हवालदार, वैभव उर्फ बंटी माठेकर, सुनील सावंत, मनोहर मसुरकर, रघुनाथ कोरगावकर आणि चंद्रशेखर गिरप यांच्यासह शेकडो परमपूज्य सद्गुरु मियांसाब भक्त मंडळाचे पदाधिकारी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




