उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत विधान भवनात महत्त्वाची बैठक; ऑगस्ट महिन्यात गोव्यात गुंतवणूक परिषद रंगणार
मुंबई, दि ०२ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील आडाळी औद्योगिक वसाहतीमधील (एम.आय.डी.सी.) प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी आणि स्थानिक उद्योगधंद्यांना गती देण्यासाठी आज विधान भवन येथे एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आणि सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांच्या आग्रही मागणीवरून व प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत आडाळी एम.आय.डी.सी.बाबत अनेक महत्त्वपूर्ण आणि धाडसी निर्णय घेण्यात आले. यात प्रामुख्याने पूर्वीच्या भूखंड वाटपावरील स्थगिती उठवण्याचा आणि बहुचर्चित प्रस्तावित गोल्फ कोर्स प्रकल्प रद्द करण्याचा मोठा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

या विशेष बैठकीमध्ये आडाळी एम.आय.डी.सी.चा विकास जलद गतीने करण्यावर प्रामुख्याने भर देण्यात आला. ज्या उद्योजकांनी यापूर्वी येथे भूखंड खरेदी केले होते, त्यांना भूखंडाचा ताबा देणे, करार करणे आणि बांधकाम परवानगी देणे या बाबींना पूर्वी स्थगिती देण्यात आली होती. ही स्थगिती आजच्या बैठकीत पूर्णपणे उठवण्यात आल्यामुळे स्थानिक पातळीवर कारखाने सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याचसोबत नवीन इच्छुक उद्योजकांसाठी भूखंड खरेदीची ऑनलाईन प्रक्रिया पुढील दोन आठवड्यांत सुरू केली जाणार असून, नव्याने उद्योग सुरू करू इच्छिणाऱ्यांना यात सहभागी होता येणार आहे. आडाळी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक वाढावी आणि उद्योजक आकर्षित व्हावेत, यासाठी आगामी ऑगस्ट महिन्यात गोवा येथे एका विशेष गुंतवणूक परिषदेचे आयोजन करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.
सिंधुदुर्गातील उद्योजकांना प्रशासकीय कामासाठी वारंवार रत्नागिरी येथील मुख्य कार्यालयात जावे लागत असल्यामुळे होणारी मोठी गैरसोय आता दूर होणार आहे. यावर तोडगा म्हणून आडाळी येथे दर गुरुवारी एम.आय.डी.सी.च्या विभागीय कार्यालयातील अधिकारी कार्यालयीन कामकाजासाठी प्रत्यक्ष उपलब्ध राहणार आहेत. याशिवाय, वसाहतीमधील पायाभूत सुविधांचा आढावा घेताना इन्सुली ते आडाळी दरम्यानच्या पर्यायी ३३ के.व्ही. वीज वाहिनीचे संथ गतीने सुरू असलेले काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित विभागाला देण्यात आले. तसेच, जवळच असलेल्या तिलारी पाणीपुरवठा योजनेच्या पाण्याचा वापर करून ‘डेटा सेंटर’ किंवा त्यासारखे मोठे उद्योग उभारता येतील का, याची तांत्रिक पाहणी करून त्याचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेशही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
या अत्यंत महत्त्वाच्या बैठकीला उद्योग विभागाचे प्रधान सचिव, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे (एमआयडीसी) मुख्य कार्यकारी अधिकारी, सह-मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य अभियंता (मुख्यालय), सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे (ऑनलाईन उपस्थिती), उद्योग विभागाचे सहसचिव, महाव्यवस्थापक (भूमी), प्रादेशिक अधिकारी आणि इतर वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. आडाळी एम.आय.डी.सी.च्या प्रलंबित समस्यांबाबत आपल्या आग्रही मागणीची दखल घेत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी तातडीने बैठक बोलावली आणि सकारात्मक निर्णय घेतले, याबद्दल आमदार दीपक केसरकर यांनी मंत्री महोदयांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. या निर्णयांमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्राला आता नवी संजीवनी मिळणार आहे.




