सावंतवाडी, दि.०१ : “ओंकार” हत्तीचे पुन्हा एकदा वेत्ये गावात आगमन झाल्याने परिसरात भीतीचे सावट पसरले आहे. रविवारी रात्री ओंकार हत्तीने वेत्ये येथे दर्शन दिल्यानंतर ग्रामस्थांमध्ये एकच खळबळ उडाली. वारंवार होत असलेल्या या हत्तीच्या वावरामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून वनविभागाच्या कार्यक्षमतेवर आता गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
याच पार्श्वभूमीवर वेत्येचे सरपंच गुणाजी गावडे यांनी वनविभागावर संतप्त शब्दांत टीका केली आहे. “ओंकारच्या हालचालींची माहिती असूनही वनविभाग नेमके काय करत आहे? ग्रामस्थांच्या जीविताचे संरक्षण करण्यासाठी ठोस उपाययोजना का होत नाहीत?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून ओंकार हत्तीच्या वावरामुळे वेत्ये आणि आसपासच्या परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. शेतकरी, मजूर तसेच रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. हत्तीच्या पुनरागमनामुळे ग्रामस्थांची चिंता अधिकच वाढली असून वनविभागाने तातडीने प्रभावी पावले उचलण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
“हत्तीचा धुमाकूळ आणि प्रशासनाचा मौनकल्लोळ” अशी चर्चा आता गावोगावी रंगू लागली आहे. ओंकारच्या हालचालींवर नियंत्रण मिळवून नागरिकांना दिलासा देण्यासाठी वनविभाग कोणती भूमिका घेतो, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागून आहे.



