प्रक्रिया उद्योगातील अडचणींवर मात करण्यासाठी मनीष दळवींच्या अध्यक्षतेखाली सिंधुदुर्गात पहिली सभा संपन्न
सिंधुदुर्ग,दि.०८: कोकणातील काजू प्रक्रिया उद्योगासमोरील आव्हाने, खेळत्या भांडवलाची कमतरता आणि कच्च्या मालाची अनियमितता यांसारख्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र राज्य काजू मंडळाने पुढाकार घेतला आहे. या समस्यांचे निराकरण करणारी एक सर्वसमावेशक (Comprehensive) योजना तयार करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या विशेष समितीची पहिली बैठक शुक्रवार, ८ मे २०२६ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात पार पडली. समितीचे अध्यक्ष तथा काजू मंडळाचे संचालक मनीष दळवी यांनी या सभेचे नेतृत्व केले.
या सभेच्या प्रारंभी समिती सचिव तथा महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक मिलिंद जोशी यांनी प्रास्ताविक सादर केले. व्यासपीठावर महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम, सरव्यवस्थापक विनायक कोकरे, समिती सदस्य डॉ. परशुराम पाटील, यादव, रुपेश बेलोसे, सहाय्यक सरव्यवस्थापक महेंद्र पवार, बाजार समिती सभापती तुळशीदास रावराणे यांच्यासह कृषी व सहकार विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

शेतकरी आणि प्रक्रियादारांशी थेट संवाद
सभेमध्ये उपस्थित शेतकरी आणि प्रक्रियादारांनी मार्केटिंग, निर्यात, प्रोसेसिंग आणि आर्थिक बाबींशी संबंधित आपल्या समस्या मांडल्या. यावर केवळ चर्चा न करता ठोस उपाययोजना आखण्यावर भर देण्यात आला. विशेषतः काजू उत्पादन वाढवणे, विकास सहकारी संस्था व खरेदी-विक्री संघांच्या माध्यमातून सुसज्ज गोदामे उभारणे आणि कारखानदारांना दर्जेदार काजू बीचा पुरवठा करणे यावर सविस्तर खल झाला. कोकणातील काजूला जागतिक ओळख मिळवून देण्यासाठी ‘जीआय’ मानांकन मिळवणे, शेतकऱ्यांची नोंदणी करणे, स्वतंत्र ब्रँड विकसित करणे आणि काजू बोंडू प्रक्रिया उद्योगाला गती देणे यांसारखे निर्णय या बैठकीत घेण्यात आले.
कार्यकारी संचालक संजय कदम यांनी काजू मंडळाच्या उद्दिष्टांची माहिती देत शेतकरी आणि उद्योजकांच्या समस्यांवर आपले अभ्यासपूर्ण मत व्यक्त केले. अध्यक्ष मनीष दळवी यांनी आपल्या मनोगतातून शेतकरी व प्रक्रियादारांनी सुचवलेल्या महत्त्वपूर्ण सूचनांचे स्वागत केले आणि या सर्व बाबींचा समावेश असलेला अहवाल शिफारशींसह राज्य शासनाकडे सादर करण्यात येणार असल्याचे ग्वाही दिली. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नाईकनवरे, जिल्हा उपनिबंधक सुनील मरबळ, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्रीपाद दामले आणि फळ संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ क्षीरसागर उपस्थित होते. सभेची सांगता मिलिंद जोशी यांनी मानलेल्या आभार प्रदर्शनाने झाली.



