Home News आयुष्याचा शेवट हा पर्याय नव्हे..! मुलांनी पालकांशी संवाद साधणे हीच काळाची गरज

आयुष्याचा शेवट हा पर्याय नव्हे..! मुलांनी पालकांशी संवाद साधणे हीच काळाची गरज

0
11

सिंधुदुर्ग,दि.०३: जिल्ह्याला सुसंस्कृत आणि संतांची भूमी म्हणून ओळखले जाते, मात्र अलीकडच्या काळात जिल्ह्यात घडणाऱ्या खून, हाणामारी आणि विशेषतः आत्महत्येच्या वाढत्या घटनांमुळे या प्रतिमेला तडा जात आहे. ही परिस्थिती जिल्ह्यासाठी निश्चितच भूषणावह नाही. विशेषतः गेल्या चार दिवसांत सावंतवाडी शहरात तीन आत्महत्या झाल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एकाच दिवशी दोन व्यक्तींनी आपले जीवन संपवल्याचा हृदयद्रावक प्रकार घडला असून, यामुळे समाजात चिंतेचे वातावरण पसरले आहे. अशा घटना का घडत आहेत, याचा अभ्यास करून समाजात जनजागृती करणे आता काळाची गरज बनली आहे.

समाजातील बुद्धिजीवी आणि समाजसुधारकांनी या वाढत्या आत्महत्येच्या प्रवृत्तीवर गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. पालकांसाठी आपली मुले हेच त्यांचे विश्व असते. स्वतःची परिस्थिती बेताची असतानाही, रक्ताचे पाणी करून आई-वडील आपल्या मुलांना शिक्षण देतात आणि त्यांचे भवितव्य घडवण्यासाठी रात्रंदिवस कष्ट करतात. आपल्यावर अपार प्रेम करणाऱ्या घरातील व्यक्तींचा आणि आई-वडिलांच्या कष्टाचा साधा विचारही मनात न आणता टोकाचे पाऊल उचलणे ही अत्यंत वेदनादायक बाब आहे. आयुष्यात येणाऱ्या अडचणींना घाबरून न जाता, त्यांचा सामना करणे हेच खरे जीवन आहे.

मुलांनी आणि तरुणांनी आपल्या मनातील शंका, भीती किंवा कोणत्याही समस्यांबाबत पालकांशी निसंकोचपणे संवाद साधला पाहिजे. मनात साचलेले दुःख बोलून दाखवल्यास त्यातून नक्कीच मार्ग निघू शकतो. आपण आपले जीवन संपवतो, मात्र आपल्या मागे राहणाऱ्या कुटुंबाला किती मरणप्राय यातना सहन कराव्या लागतात, याची जाणीव प्रत्येकाने ठेवायला हवी. शिक्षक, पालक आणि समाजधुरिणांनी मुलांच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष देऊन त्यांच्यात जगण्याची उमेद निर्माण करणे आवश्यक आहे. आपले आयुष्य हे केवळ आपले नसून त्यावर प्रेम करणाऱ्या अनेकांचे असते, हे लक्षात घेऊन संघर्षातून मार्ग काढत आनंदाने जगणे हीच काळाची गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here