सावंतवाडी,दि.०३: सिंधुदुर्ग जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी तालुक्यातील आरोंदा मतदारसंघात महायुतीचे राजकीय समीकरण पूर्णपणे कोलमडल्याचे चित्र दिसत आहे. महायुतीकडून शिवसेनेचे सुदन कवठणकर निवडणूक रिंगणात असले तरी, अपक्ष उमेदवार शर्वाणी गांवकर यांनी प्रचारात घेतलेली जोरदार मुसंडी सत्ताधाऱ्यांसाठी चिंतेचा विषय ठरली आहे. गावोगावी मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता ही लढत आता केवळ औपचारिक उरल्याची चर्चा मतदारसंघात रंगू लागली असून, विकासाचे दावे आणि पक्षशिस्तीच्या भाषेला मतदारांनी झुगारल्याचे स्पष्ट होत आहे.
भाजपमधील अंतर्गत नाराजी, कार्यकर्त्यांची झालेली कुचंबणा आणि स्थानिक नेतृत्वाकडे दुर्लक्ष या बाबी महायुतीच्या मुळावर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याच संधीचा फायदा घेत माजी सभापती शर्वाणी गांवकर यांनी ‘काम, संपर्क आणि विश्वास’ या त्रिसूत्रीच्या जोरावर मतदारांशी थेट नाळ जोडली आहे. अमेय आरोंदेकर यांनी उमेदवारी मागे घेतल्याने आरोंद्यातील राजकीय मैदानाचा नूर पालटला असून, ही लढत आता स्पष्टपणे ‘महायुती विरुद्ध शर्वाणी गांवकर’ अशीच होताना दिसत आहे. इतरही अपक्ष उमेदवार रिंगणात असले तरी खऱ्या अर्थाने गावकर यांनीच प्रचाराचा राडा तापवला आहे.
एकिकडे महायुतीचे उमेदवार केवळ पक्षाच्या नावावर आणि चिन्हावर मते मागत असताना, दुसरीकडे शर्वाणी गांवकर आपल्या गेल्या काही वर्षांतील कामगिरीचा लेखाजोखा मांडत आहेत. “पक्ष नव्हे, तर परखड नेतृत्व” हा नवा कल आरोंद्याच्या जमिनीवर उतरल्याचे दिसत आहे. सध्याची परिस्थिती पाहता महायुती पूर्णपणे बचावात्मक भूमिकेत शिरली असून, शर्वाणी गांवकर यांनी आक्रमक पवित्रा घेत विजयाकडे कूच केली आहे. मतदानाच्या दिवशी आरोंद्यातून सत्ताधाऱ्यांना मोठा धक्का बसण्याची आणि परिवर्तनाचा ठोस संदेश जाण्याची दाट शक्यता राजकीय विश्लेषकांकडून वर्तवली जात आहे.



