सिंधुदुर्गचे ‘एआय मॉडेल’ राष्ट्रीय पातळीवर; अभ्यासासाठी नीती आयोग ३० व ३१ ऑक्टोबरला जिल्हा दौऱ्यावर

0
53

पालकमंत्री नितेश राणे यांची पत्रकार परिषदेत माहिती; ‘सिंधुदुर्ग मॉडेल’चा होणार सखोल अभ्यास

सिंधुदुर्ग,दि.२५: देशातील पहिला कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) प्रणाली स्वीकारणारा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या ‘एआय मॉडेल’ची राष्ट्रीय स्तरावर गंभीर दखल घेण्यात आली आहे. या अद्वितीय मॉडेलचा सखोल अभ्यास करण्यासाठी नीती आयोगाचे एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ येत्या ३० आणि ३१ ऑक्टोबर रोजी दोन दिवसांच्या दौऱ्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत असल्याची माहिती पालकमंत्री नितेश राणे यांनी आज एका पत्रकार परिषदेत दिली.

या पत्रकार परिषदेला जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमीसे, अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम आदी उपस्थित होते.

मंत्री नितेश राणे यांनी सांगितले की, नीती आयोगाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सिंधुदुर्ग जिल्ह्यात राबविण्यात आलेले ‘एआय मॉडेल’ हे देशासाठी एक पथदर्शी प्रकल्प ठरले आहे. या मॉडेलचा सखोल अभ्यास या दोन दिवसांच्या दौऱ्यात केला जाणार आहे. जिल्हा प्रशासनाने एआय तंत्रज्ञानाचा वापर करून विविध शासकीय विभागांमधील कार्यप्रणाली अधिक जलद आणि परिणामकारक करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.

‘मार्व्हल कंपनी’च्या माध्यमातून चालवली जाणारी ही एआय प्रणाली जिल्ह्यात १ मे २०२५ पासून कार्यरत आहे. आरोग्य, पोलीस, आरटीओ, जिल्हा परिषद तसेच अन्य विविध विभागांमध्ये या एआय प्रणालीचा वापर सुरू झाला आहे. या वापरामुळे प्रशासनिक कामकाजात झालेला सकारात्मक बदल, अंमलबजावणीतील आव्हाने आणि त्यावरील उपाययोजना यांचा सविस्तर आढावा नीती आयोगाचे अधिकारी घेणार आहेत.

नीती आयोगाचे शिष्टमंडळ ३० ऑक्टोबर रोजी सकाळी १०:०० वाजल्यापासून ते ३१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ०५:०० वाजेपर्यंत जिल्ह्यात असणार आहे. या दोन दिवसांच्या दौऱ्यात, सर्व विभागप्रमुख आपापल्या विभागात एआयच्या माध्यमातून झालेल्या बदलांची आणि सुधारणा उपक्रमांची माहिती सादरीकरणाद्वारे आयोगासमोर सादर करणार आहेत. ग्रामीण भागातील एक जिल्हा भविष्यात ‘एआय-सक्षम’ जिल्हा कसा बनू शकतो, हे ‘सिंधुदुर्ग मॉडेल’द्वारे नीती आयोग समजून घेणार आहे.

पालकमंत्री राणे पुढे म्हणाले, “नीती आयोग हे थेट पंतप्रधान कार्यालयाला रिपोर्ट करणारी आणि देशाच्या आर्थिक व विकासात्मक नियोजनात महत्त्वाची भूमिका बजावणारी केंद्र सरकारची मुख्य संस्था आहे. त्यांचे प्रतिनिधी सिंधुदुर्गच्या एआय उपक्रमाचा अभ्यास करणार आहेत, ही बाब जिल्ह्यासाठी अत्यंत अभिमानाची आहे.”

या दौऱ्याच्या संदर्भात आज जिल्हा प्रशासनाची आढावा बैठक झाली असून, मंत्रालयातही याबाबत सविस्तर चर्चा झाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या उपक्रमाबाबत जिल्हा प्रशासनाला मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. तसेच राज्याचे मुख्य सचिव आणि इतर वरिष्ठ अधिकारीही या उपक्रमावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

“३० व ३१ ऑक्टोबर हे दोन दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासातील एआय युगाचे सुवर्णपान ठरणार आहेत. सिंधुदुर्ग मॉडेलला राष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी नीती आयोगाचा हा अभ्यास महत्त्वाचा ठरेल,” असा विश्वासही पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here