अग्निशमन केंद्रासाठी तीन कोटी २७ लाख मंजूर…

0
105

शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या पाठपुराव्याला यश…

सावंतवाडी, दि.२२ : गेली पंधरा वर्षे प्रतीक्षेत असलेल्या सावंतवाडी पालिकेच्या अग्निशमन केंद्राचे काम लवकरच सुरू होणार आहे. त्यासाठी तीन कोटी सत्तावीस लाख रुपये मंजूर झाले आहेत. सध्या प्राथमिक टप्प्याचे काम सुरू झाले आहे. लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे.

सावंतवाडी शहर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर आहे. परंतु, या शहरात पालिकेचे स्वतंत्र अग्निशमन केंद्र नाही. त्यामुळे अग्निशमन केंद्र सुरू करण्याची पालिकेने पंधरा वर्षांपूर्वी तयारी सुरू केली होती. त्याला आता मूर्त स्वरुप येणार आहे. अग्निशमन केंद्र मंजूर झाल्यानंतर १२ स्वतंत्र पदे मंजूर होणार आहेत. या अग्निशमन केंद्राचा सावंतवाडी शहराबरोबर तालुक्यातील अनेक गावांना फायदा होणार आहे.

सावंतवाडी पालिकेच्या अग्निशमन केंद्रासाठी स्वतंत्र इमारत नव्हती. त्यामुळे केवळ अग्निशमन बंबावर काम केले जात होते. कुठेही शहरात आग लागल्यानंतर अग्निशमन बंबाने पाण्याच्या फवाऱ्याने आग विझवली जात होती. अग्निशमन केंद्रात प्रशिक्षित असा कर्मचारी वर्ग नाही. केवळ कामचलावू कर्मचारी आहेत. त्यावर सर्व कारभार हाकला जातो. अग्निशमन बंबाचा वापर आग विझवण्याबरोबर शहरात कुठे पाणीटंचाई निर्माण झाल्यास पाणीपुरवठा करण्यासाठी अग्निशमन बंबाचा वापर केला जातो. शहरात अनेकवेळा आगी लागण्याच्या घटना घडल्या. त्यावेळी अग्निशमन बंबाने आग विझवण्याचे काम केले जाते. परंतु आता टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत. त्यामुळे प्रशिक्षित कर्मचारी आणि अग्निशमन केंद्राची गरज निर्माण झाली होती. दीपक केसरकर आमदार असताना नगर विकास खात्याकडे अग्निशमन केंद्राचा पाठपुरावा केला होता. भास्करराव जाधव नगरविकास राज्यमंत्री असताना सुमारे ५० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता. परंतु, त्यावेळी अग्निशमन केंद्रासाठी जागा नव्हती. पालिकेच्या बाजूला राष्ट्रीय महामार्गाचे कार्यालय होते. या कार्यालयाची जागा अग्निशमन केंद्रासाठी मिळावी, यासाठी पालिकेने प्रयत्न सुरू केले होते. परंतु, राष्ट्रीय मार्ग विभागाचे कार्यालय येथे असल्यामुळे पालिकेचा न्यायालयात झाला होता. झाराप-पत्रादेवी बायपास व मुंबई-गोवा राष्ट्रीय मार्गाचे चौपदरीकरण करण्याचे काम सुरू झाल्यानंतर पालिकेच्याजवळ असलेले राष्ट्रीय महामार्गाचे कार्यालय कसाल येथे हलवण्यात आले. त्यामुळे पालिकेने राष्ट्रीय महामार्ग विभागाची जागा पालिकेच्या ताब्यात मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू केले. भवन जळगावकर मुख्याधिकारी असताना ही जागा पालिकेच्या ताब्यात आली तरी अग्निशमन केंद्राचे काम सुरू होत नव्हते. या काळात केसरकर गृहराज्यमंत्री झाले. त्यांनी पुन्हा अग्निशमन केंद्रासाठी पाठपुरावा सुरू केला. परंतु पाच वर्षात अग्निशमन केंद्र अस्तित्वात आले नाही. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले. या सरकारच्या काळातही त्यांनी पाठपुरावा सुरू केला. परंतु पुन्हा सत्तांतर होऊन भाजप-शिवसेनेचे सरकार राज्यात सत्तेवर आले. फक्त राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अजित पवार सरकारमध्ये समाविष्ट झाले. या काळात शासन आपल्या दारी कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जिल्ह्यात आले होते. त्यांचा सावंतवाडीतही कार्यक्रम झाला. या पार्श्वभूमीवर सावंतवाडी पालिकेच्या अग्निशमन केंद्राला त्यांनी हिरवा कंदील दाखवला. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या पाठपुराव्याला यश येऊन या केंद्राला तीन कोटी सत्तावीस लाख रुपये मंजूर झाले. आता लवकरच अग्निशमन केंद्राचे काम सुरू होणार असून प्राथमिक टप्प्यातील लेव्हलिंगचे काम सुरू आहे. आगामी काळात अग्निशमन केंद्राचे भूमिपूजन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते होणार आहे. या अग्निशमन केंद्रात अग्निशमन बंब ठेवण्यासाठी जागा तसेच कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाची सुविधा असणार आहे. तसेच अग्निशमन केंद्रासाठी १२ पदे मंजूर होणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here