Home News गावातील शाळेत शिकून मोठे व्हा, उद्योग-व्यवसायाभिमुख शिक्षण घ्या: गजानन परब

गावातील शाळेत शिकून मोठे व्हा, उद्योग-व्यवसायाभिमुख शिक्षण घ्या: गजानन परब

0
10

कुणकेरी येथील आचार्य विनोबा भावे विद्यालयात दहावीच्या गुणवंतांचा गौरव सोहळा संपन्न

सावंतवाडी, दि.२६: गावातील मराठी माध्यमाच्या शाळेत शिकून मोठे होण्याचा अभिमान फार वेगळा असतो. मी स्वतः कुणकेरी येथील आचार्य विनोबा भावे माध्यमिक विद्यालयात शिकलो असून या शाळेने अनेक गुणवंत विद्यार्थी घडवले आहेत. पुढील शिक्षण घेताना विद्यार्थ्यांनी केवळ पदव्यांमागे न धावता, ज्यातून स्वतःचा उद्योग-व्यवसाय सुरू करून मोठे होता येईल, असे कौशल्याधारित शिक्षण घ्यावे, असे आवाहन सावंतवाडी नगरपालिकेचे अधिकारी तथा शाळेचे माजी विद्यार्थी गजानन परब यांनी केले. कुणकेरी येथील आचार्य विनोबा भावे माध्यमिक विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार आणि गौरव समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकसेवा संघ कुडाळ संस्थेचे अध्यक्ष प्रसाद रेगे होते. तर व्यासपीठावर संस्थेचे सचिव उत्तम सराफदार, शाळा समिती सदस्य शांताराम परब, पांडुरंग परब, आंबेगावचे सरपंच श्री. परब, मुख्याध्यापिका अर्चना सावंत, वाडोस हायस्कूलचे मुख्याध्यापक सुहास आंबेस्कर, माजी मुख्याध्यापक भरत सराफदार, पालक प्रतिनिधी श्रीमती जोशी व श्रीमती परब आदि मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्यात दहावीच्या परीक्षेत विद्यालयातून अनुक्रमे प्रथम आलेला प्रणय सिताराम परब, द्वितीय आलेला सोहम गंगाराम गावडे आणि तृतीय आलेला सूर्यकांत अंकुश जोशी या गुणवंत विद्यार्थ्यांचा भेटवस्तू देऊन संस्थेचे अध्यक्ष प्रसाद रेगे, सचिव उत्तम सराफदार व प्रमुख पाहुणे गजानन परब यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

विद्यार्थ्यांना आणि पालकांना मार्गदर्शन करताना श्री. परब पुढे म्हणाले की, मुलांनी आपल्या गावातीलच शाळेत शिकायला हवे. गावाबाहेर जाऊन प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेण्यापेक्षा गावातल्या शाळेतच दर्जेदार शिक्षण मिळते. गावाबाहेरील शाळेत जाण्याने वेळ आणि पैसा दोन्हीचा अपव्यय होतो, त्यामुळे पालक आणि पाल्य या दोघांनीही बाहेरील शाळांचा मोह टाळायला हवा. आपल्या गावची शाळा हे आपले भूषण आहे, असे गौरवद्गार त्यांनी काढले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रसाद रेगे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या, तर शांताराम परब व पांडुरंग परब यांनीही विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.

सत्काराला उत्तर देताना प्रणय परब आणि सूर्यकांत जोशी या विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, या शाळेतील शिक्षकांनी आमच्यावर उत्तम संस्कार करून आम्हाला घडवले आहे. आम्ही या शाळेचे ऋण कधीही विसरणार नाही. पुढील उच्च शिक्षण घेऊन आम्ही गावचे आणि शाळेचे नाव नक्कीच उज्ज्वल करू, असा विश्वास त्यांनी यावेळी दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका अर्चना सावंत यांनी केले, तर उपस्थित पाहुण्यांचे स्वागत भरत सराफदार यांनी केले. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन विद्यार्थिनी सानिका कुंभार हिने केले, तर विद्या जंगले हिने उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमाला विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक श्री. राऊळ, कर्मचारी अनिल परब, राजन गोसावी यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.

Home » गावातील शाळेत शिकून मोठे व्हा, उद्योग-व्यवसायाभिमुख शिक्षण घ्या: गजानन परब

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here