Home News सिंधुदुर्गातील मराठा समाजाच्या गुणवंतांचा ‘सावंतवाडीत’ दिमाखदार सोहळा!

सिंधुदुर्गातील मराठा समाजाच्या गुणवंतांचा ‘सावंतवाडीत’ दिमाखदार सोहळा!

0
3

९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्यांचा होणार विशेष सन्मान; १३ जूनला दिग्गजांची उपस्थिती

सावंतवाडी,दि .११: केवळ गुण मिळवणे ही वैयक्तिक यशाची पायरी नसून, तो अखंड समाजाच्या प्रगतीचा गौरवशाली उत्सव असतो. याच भावनेतून, दहावी आणि बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या मराठा समाजातील तेजस ताऱ्यांचे कौतुक करण्यासाठी सकल मराठा समाज सिंधुदुर्ग सज्ज झाला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही गुणवंत विद्यार्थ्यांचा हा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला असून, येत्या शनिवार, दि. १३ जून रोजी सायंकाळी ४ वाजता सावंतवाडी येथील मांगिरीश बॅन्क्वेट हॉल, राजवाड्याच्या पाठीमागे, आरेकर खानावळीच्या बाजूला येथे हा कौतुक सोहळा दिमाखात पार पडणार आहे.

या सोहळ्याला विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी आणि त्यांना पुढील वाटचालीस प्रोत्साहन देण्यासाठी जिल्ह्यातील अनेक प्रमुख मान्यवरांची मांदियाळी जमणार आहे. यामध्ये कुडाळ-मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत, नगराध्यक्षा सौ. श्रद्धा राजे भोसले, तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक संजू परब, युवराज लखमराजे भोसले आणि ज्येष्ठ नेते संदीप कुडतरकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

सकल मराठा समाजाच्या वतीने दरवर्षी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाचा गौरव केला जातो. यंदाच्या सोहळ्यात दहावी व बारावीच्या परीक्षेत ७० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच ९० टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना शाल, श्रीफळ, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह प्रदान करून विशेष सन्मान केला जाणार आहे. याशिवाय केवळ अभ्यासातच नव्हे, तर शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक तसेच इतर विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचाही मान्यवरांच्या हस्ते गौरव केला जाईल. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मकता आणि आत्मविश्वास तर वाढतोच, शिवाय समाजाशी असलेले नाते अधिक दृढ होण्यास मदत होते, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप आपली नावनोंदणी केलेली नाही, त्यांच्यासाठी एक महत्त्वाची संधी असून त्यांनी कार्यक्रमाच्या अर्धा तास अगोदर उपस्थित राहून आपली नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन सकल मराठा समाजाचे जिल्हाध्यक्ष सीताराम गावडे व कार्यकारिणीच्या वतीने करण्यात आले आहे. गुणवंतांचा सन्मान हा केवळ एका व्यक्तीचा गौरव नसून समाजाच्या प्रगतीचा उत्सव आहे, त्यामुळे मराठा समाजातील विद्यार्थी, पालक आणि समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या प्रेरणादायी सोहळ्याला यशस्वी करावे, असे आवाहनही समितीने शेवटी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here