सावंतवाडी,दि.०७: सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात विकासाचे व्हिजन घेऊन मैदानात उतरलेले युवा नेतृत्व संदीप गावडे यांच्या प्रचाराने आता गती घेतली असून, महायुतीचे खंबीर नेते विशाल परब यांच्या नियोजनामुळे विरोधकांचे धाबे दणाणले आहेत. या निवडणुकीत कोणताही भावनिक मुद्दा चालणार नाही, तर केवळ आणि केवळ विकासकामांच्या जोरावर संदीप गावडे ऐतिहासिक मताधिक्याने विजयी होतील, असा ठाम विश्वास महायुतीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
संदीप गावडे यांनी आपल्या पंचायत समिती सदस्यत्वाच्या कार्यकाळात कामाचा डोंगर उभा केला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सहकार्याने त्यांनी सावंतवाडी तालुक्यात मोठा विकास निधी उपलब्ध करून दिला. रस्त्यांचे जाळे असो किंवा ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा, संदीप गावडेंनी नेहमीच सामान्यांच्या हिताला प्राधान्य दिले आहे. त्यांच्या या अनुभवाचा आणि विकासाच्या ध्येयाचा फायदा संपूर्ण मतदारसंघाला होणार आहे.

निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांकडून जाणीवपूर्वक ‘बाहेरचा’ असा मुद्दा उपस्थित करून मतदारांचे लक्ष भरकटवण्याचे काम सुरू आहे. मात्र, हा मुद्दा म्हणजे केवळ विकासाच्या कामात खोडा घालण्याचा प्रकार असल्याची भावना जनतेत निर्माण झाली आहे. “बाहेरचा मुद्दा घेऊन राजकारण करणाऱ्यांनी आधी या भागासाठी त्यांनी स्वतः काय केले, याचा हिशोब द्यावा,” असे चोख प्रत्युत्तर संदीप गावडे समर्थकांनी दिले आहे. जनतेला आता पोकळ आश्वासने नको तर प्रत्यक्ष काम करणारा माणूस हवा आहे, हे गावडेंना मिळणाऱ्या प्रतिसादामुळे स्पष्ट होत आहे.
खासदार नारायण राणे आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या खंबीर नेतृत्वाखाली राज्यात महायुतीची सत्ता येणार हे निश्चित असून, सावंतवाडीत विशाल परब यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली संदीप गावडे हे विजयाचा गुलाल उधळतील, असा आत्मविश्वास महायुतीने व्यक्त केला आहे.




