Home News पालकमंत्री नितेश राणेंचा ‘सिंधुदुर्ग पॅटर्न’; थेट संवादामुळे उपोषणकर्त्यांची संख्या १५० वरून २०...

पालकमंत्री नितेश राणेंचा ‘सिंधुदुर्ग पॅटर्न’; थेट संवादामुळे उपोषणकर्त्यांची संख्या १५० वरून २० वर

0
2

सिंधुदुर्ग,दि.१५: स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे आणि जिल्हा प्रशासनाने दाखवलेल्या तत्परतेमुळे जिल्ह्यात एक सकारात्मक चित्र पाहायला मिळाले आहे. दरवर्षी स्वातंत्र्यदिनी विविध मागण्यांसाठी उपोषणाला बसणाऱ्या नागरिकांशी पालकमंत्र्यांनी थेट संवाद साधून मार्ग काढल्याने उपोषणकर्त्यांची संख्या १०० ते १५० वरून थेट २० वर आली आहे. संवादातून प्रश्न सुटू शकतात, हा विश्वास प्रशासनाने निर्माण केल्याने नागरिकांनी संघर्षाऐवजी चर्चेला पसंती दिली आहे.

प्रशासकीय तत्परता आणि संवादाला प्राधान्य

जनतेने आपल्या हक्कांच्या मागण्यांसाठी उपोषणाची नोटीस दिल्यानंतर पालकमंत्री नितेश राणे यांनी त्याची तात्काळ दखल घेतली. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला त्यांनी उपोषणकर्त्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच संबंधित यंत्रणांना वस्तुस्थिती समजून घेऊन नियमांच्या चौकटीत योग्य ती कार्यवाही करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. प्रशासकीय पातळीवर मिळालेल्या या सकारात्मक प्रतिसादामुळे अनेक उपोषणकर्त्यांचे समाधान झाले असून, त्यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला.

विविध विभागांतील प्रश्नांवर पाठपुरावा

सहकार, महसूल, जिल्हा परिषद, कृषी, पोलीस, नगरपालिका, पाणीपुरवठा, वीज वितरण आणि बीएसएनएल टॉवर यांसारख्या विविध विषयांवरील तक्रारींचा आढावा पालकमंत्र्यांनी घेतला. यापूर्वी प्राप्त झालेल्या ११० नागरिकांच्या समस्यांवर प्रशासकीय स्तरावर कार्यवाही सुरू करण्यात आली असून, उर्वरित २० प्रकरणांवरही सध्या काम सुरू आहे. प्रशासन आपल्या मागण्यांवर सकारात्मकतेने विचार करत असल्याची खात्री पटल्याने नागरिकांनीही आपल्या समस्या उपोषणाऐवजी संवादाच्या माध्यमातून मांडण्यास मान्यता दिली आहे. पालकमंत्री आणि प्रशासनाच्या या संयुक्त पुढाकारामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याची एक सकारात्मक मानसिकता आणि नवी प्रतिमा निर्माण होत असल्याचे स्वातंत्र्यदिनी दिसून आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here