२४ वर्षांचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी विक्रांत सावंत सरसावले; पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले तातडीने काम पूर्ण करण्याचे आदेश
सावंतवाडी, दि.०५: सावंतवाडी तालुक्यातील माजगाव येथील शेतकऱ्यांच्या जमिनींचे नकाशे जीर्ण झाल्याच्या कारणावरून ते उपलब्ध करून देण्यास टाळाटाळ करणाऱ्या भूमी अभिलेख प्रशासनाच्या विरोधात माजगाव ग्रामस्थांनी तीव्र आंदोलन छेडले होते. या आंदोलनानंतर प्रशासनाने दोन महिन्यांत नकाशे देण्याचे आश्वासन दिले असले, तरी या प्रक्रियेला गती मिळावी आणि शेतकऱ्यांना त्वरित न्याय मिळावा यासाठी जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत यांनी आज अत्यंत महत्त्वपूर्ण व यशस्वी पुढाकार घेतला. विक्रांत सावंत यांनी थेट जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचे या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधले असून, त्यांच्या या प्रयत्नांमुळे पालकमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने नकाशे देण्याच्या कामाला लागण्याचे कडक आदेश दिले आहेत.
सन २००० मध्ये सिंधुदुर्ग जिल्हा वेगळा झाल्यापासून म्हणजेच गेली २४ वर्षे माजगाव येथील शेतकरी आपल्या जमिनींच्या नकाशांसाठी भूमी अभिलेख कार्यालयाकडे सातत्याने पाठपुरावा करत आहेत. मात्र, नकाशे उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या जमिनीची हद्द निश्चित करता येत नव्हती. इतकेच नव्हे तर अवकाळी पाऊस आणि वन्य प्राण्यांमुळे शेतीच्या होणाऱ्या अतोनात नुकसानीची शासकीय भरपाई मिळवताना देखील नकाशे नसल्याने शेतकऱ्यांचे हक्काचे प्रस्ताव फेटाळले जात होते. या प्रशासकीय त्रासाला कंटाळून अखेर माजी पंचायत समिती सदस्य श्रीकृष्ण सावंत यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण छेडले होते. त्यावेळी तहसीलदार आणि भूमी अभिलेख अधिकाऱ्यांनी वरिष्ठ पातळीवर पत्रव्यवहार करून दोन महिन्यात नव्याने नकाशे देण्याचे लेखी आश्वासन दिले होते.
प्रशासनाने आश्वासन दिले असले तरी ते केवळ कागदावरच राहू नये आणि शेतकऱ्यांची पिळवणूक थांबावी यासाठी जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत यांनी आज सावंतवाडी दौऱ्यावर असलेल्या पालकमंत्री नितेश राणे यांची विशेष भेट घेतली. विक्रांत सावंत यांनी माजगावच्या शेतकऱ्यांच्या नकाशांचा प्रश्न आणि प्रशासनाने दिलेल्या लेखी आश्वासनाची वस्तुस्थिती पालकमंत्र्यांसमोर अत्यंत प्रभावीपणे मांडली. हा प्रश्न शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा असल्याने यामध्ये तातडीने हस्तक्षेप करण्याची विनंती त्यांनी केली.
विक्रांत सावंत यांनी केलेल्या या यशस्वी पाठपुराव्याची आणि मांडलेल्या भूमिकेची दखल घेत पालकमंत्री नितेश राणे यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना पाचारण केले. माजगावच्या शेतकऱ्यांची मागणी अत्यंत रास्त असून, प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानुसार नकाशे देण्याचे काम तातडीने आणि युद्धपातळीवर मार्गी लावा, असे कडक आदेश मंत्री राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. विक्रांत सावंत यांच्या या आक्रमक आणि यशस्वी पुढाकारामुळे २४ वर्षांपासून प्रलंबित असलेला माजगावच्या शेतकऱ्यांच्या जमिनींच्या नकाशांचा प्रश्न आता अंतिम टप्प्यात आला असून, ग्रामस्थांमधून विक्रांत सावंत यांच्या या कामगिरीबद्दल मोठे समाधान व्यक्त होत आहे.



