Home ठळक घडामोडी ड्रोन सर्वेक्षणाविरोधात ‘कोकणी बाणा’ दाखवून देऊ; संजू परब यांचा थेट इशारा..!

ड्रोन सर्वेक्षणाविरोधात ‘कोकणी बाणा’ दाखवून देऊ; संजू परब यांचा थेट इशारा..!

0
6

आजगाव दशक्रोशीतील खनिज सर्वेक्षणाविरुद्ध मंगळवारी भव्य रॅली; वेतोबा मंदिरात सर्वपक्षीय वज्रमूठ

सावंतवाडी,दि.१८:* निसर्गसंपन्न आणि देवभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आजगावसह दशक्रोशीतील १८ गावात होणाऱ्या खनिज ड्रोन सर्वेक्षणा विरोधात आजगाव वेतोबा मंदिरात आज एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या परिसरात होणाऱ्या खनिज ड्रोन सर्वेक्षणाविरोधात स्थानिक ग्रामस्थ आणि सर्वपक्षीय नेते कमालीचे आक्रमक झाले असून, या अन्यायाविरुद्ध आजगावच्या वेतोबा मंदिरात आंदोलनाचे रणशिंग फुंकण्यात आले आहे. “निसर्गाचा विध्वंस करण्यासाठी जर आमचे शांततेतील आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला, तर वेळप्रसंगी ‘कोकणी बाणा’ दाखवून देऊ,” असा थेट इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी प्रशासनाला दिला आहे. तसेच येत्या मंगळवारी आजगाव वेतोबा मंदिर ते आरवली वेतोबा मंदिरापर्यंत भव्य निषेध रॅली काढण्यात येणार असून, यावेळी सर्वपक्षीयांसह निसर्गप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. ग्रामस्थांच्या विनंतीप्रमाणे माजी मंत्री आमदार दीपक केसरकर आणि आमदार निलेश राणे देखील या रॅलीला उपस्थित राहण्यासाठी वैयक्तिक पातळीवर प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन संजू परब यांनी यावेळी ग्रामस्थांना दिले. वेतोबाच्या नेतृत्वाखाली आपले राजकीय विचार बाजूला ठेवून निसर्गाच्या रक्षणासाठी आपण एकत्र आलो आहोत आणि या लढ्यात सर्वांना संघटित राहायचे आहे, असे सांगतानाच, मनसेच्या माध्यमातून या आंदोलनासाठी थेट राज ठाकरे यांच्याशीही संपर्क साधला जात असल्याचे परब यांनी स्पष्ट केले. सर्वेक्षण क्षेत्रात जरी १० ते १८ गावे येत असली, तरी या रॅलीला संपूर्ण जिल्ह्यातून लोक सहभागी होतील आणि आगामी चार दिवसांत घराघरात हा संदेश पोहचवून देवभूमी टिकवण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

दरम्यान, निसर्गाचे ओरबाडणे रोखण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्ण ताकदीने ग्रामस्थांच्या पाठीशी उभी राहिली आहे. मनसेचे जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर यांनी माहिती दिली की, मंगळवारी सायंकाळी होणाऱ्या या भव्य मोर्चाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वतः संबोधित करावे, या दृष्टीने सध्या नियोजन सुरू आहे. दुसरीकडे, लोकांचा वाढता पाठिंबा लक्षात घेता हा लढा आपल्या स्वतःच्या गावाचा आणि अस्तित्वाचा आहे असे समजून प्रत्येकाने यात सहभागी व्हावे, असे आवाहन संघर्ष समितीचे ॲड. स्वप्नील प्रभूआजगावकर यांनी केले. आजगावच्या सरपंच यशश्री सौदागर यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, आमचे गाव अत्यंत निसर्गसंपन्न असून येथे आंबा, काजू आणि माडाच्या मोठ्या फळबागा आहेत; जर हा विध्वंस झाला तर इथले जलस्रोत पूर्णपणे खराब होतील, त्यामुळे आम्हाला कोणत्याही परिस्थितीत खाण प्रकल्प येथे नको आहे. या महत्त्वपूर्ण बैठकीला शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, मनसे जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर, जिल्हा परिषद सदस्य सुधा कवठणकर, संघर्ष समिती अध्यक्ष अजित नातू, ॲड. स्वप्नील प्रभूआजगावकर, आजगाव सरपंच यशश्री सौदागर, रूपेश धर्णे, सचिन प्रभू, अमित प्रभू, सागर नाणोसकर, सिद्धेश परब, सुरज परब, देव्या सुर्याजी, milind सावंत, जितेंद्र मोरजकर, आबा चिपकर, नील प्रभू झांटये, रामचंद्र ऊर्फ अण्णा झाटये, श्रीनाथ केदार, रवींद्र धर्णे, सतीश आकेरकर, राजेश आजगावकर, सौरभ वराडकर, शुभम जोशी, जय केदार, हरेश वरडाकर, गोविंद वैज, संदेश वैज, सावळाराम केदार, आबा केदार, अभी केदार आदींसह परिसरातील ग्रामस्थ, शेतकरी आणि तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here