खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसाचा मुहूर्त साधत पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
वैभववाडी,दि.१०: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील भुईबावडा परिसरात शिवसेना (उबाठा) गटाला मोठे खिंडार पडले असून, उबाठाचे खंबीर नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे सुनील नारकर यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशामुळे भुईबावडा परिसरात उबाठा गटाची उरलीसुरली ताकदही संपुष्टात आली असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा सोहळा कणकवली येथे पार पडला. सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सुनील नारकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे भाजपचा भगवा रुमाल घालून पक्षात स्वागत केले. सुनील नारकर हे मुंबईतील एक यशस्वी उद्योजक असून भुईबावडा गावचे रहिवासी आहेत. सामाजिक क्षेत्रात त्यांचा मोठा वावर असून नुकत्याच पार पडलेल्या कोळपे जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांनी उबाठा गटाकडून उमेदवारी अर्जही दाखल केला होता. मात्र, तांत्रिक कारणास्तव त्यांचा अर्ज छाननीत बाद झाला होता. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून ते पक्षीय कार्यपद्धतीवर नाराज होते. अखेर उबाठा गटाच्या संघटनेला कंटाळून त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला.

यावेळी नारकर यांच्यासोबत वैभववाडी वार्ड क्रमांक ९ चे शाखाप्रमुख वैभव परब, मंगेश नाधवडेकर, अजिंक्य नारकर, सुरज मोरे, प्रथमेश पाटील, ओंकार पांचाळ, कौशिक घाडी, दिवेश गजोबार, अक्षय पंडित, रोशन बर्गे, वैभव सुतार, मिहीर रावराणे, परेश सावंत, विनोद निकम, सुनील साबळे, सुमित निकम, तेजस बोडेकर, राहुल पांचाळ, महेश परब, नरेंद्र सुतार, अमर वारके यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या मोठ्या पक्षप्रवेशामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपची ताकद कित्येक पटीने वाढली असून, उबाठा गटासमोर या भागात मोठे आव्हान उभे राहिले आहे.



