सावंतवाडी,दि.२०: “आजच्या एआय तंत्रज्ञानाच्या आणि धावपळीच्या स्पर्धेच्या युगात केवळ पदवी मिळवून चालणार नाही, तर स्वतःची किंमत वाढवण्यासाठी सातत्याने नवनवीन कौशल्ये आत्मसात करणे ही काळाची गरज आहे. ‘एसएसआय कॉम्प्युटर’सारख्या खासगी संस्थांनी कौशल्य विकास क्षेत्रात दिलेले योगदान अत्यंत मोलाचे आहे. आज तंत्रज्ञान अत्यंत वेगाने बदलत असून विद्यार्थ्यांनी ‘एआय’सारख्या प्रगत तंत्रज्ञानाशी अपडेट राहणे आवश्यक आहे. कायम शिकण्याची वृत्ती आणि स्वतःला अपडेट ठेवल्यास यश नक्कीच मिळेल,” असा मौलिक सल्ला सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिला. सावंतवाडी येथे आयोजित कार्यक्रमात जिल्हा वार्षिक योजना २०२४-२५ अंतर्गत किमान कौशल्य विकास कार्यक्रमाच्या प्रशिक्षणार्थीना प्रमाणपत्र वितरण आणि सन २०२५-२६ च्या नवीन तुकड्यांच्या प्रशिक्षणाचे उद्घाटन जिल्हाधिकारी धोडमिसे यांच्या हस्ते पार पडले, त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.

यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे म्हणाल्या की, जीवनात यश मिळवायचे असेल तर मनाशी प्रचंड जिद्द बाळगा आणि सातत्यपूर्ण परिश्रम करा. अपयशाने खचून न जाता आजच्या बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात स्वतःचे ज्ञान अद्ययावत ठेवा, तरच तुम्ही यशस्वी व्हाल. दरम्यान, त्यांनी अलीकडच्या काळात जिल्ह्याची होत असलेली प्रगती आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमधील गुणवत्तेबाबत समाधान व्यक्त केले. प्रशासकीय कामकाज सांभाळताना अनेकदा थेट जनसंपर्क कमी होतो, मात्र अशा कार्यक्रमांच्या निमित्ताने समाजातील विविध घटकांशी संवाद साधता येतो. प्रशासनासोबतच जेव्हा अशा खासगी संस्था सामाजिक विकासासाठी काम करतात, तेव्हाच खऱ्या अर्थाने समाजाचा सर्वांगीण विकास होतो. एसएसआय संस्थेने २० हजारहून अधिक विद्यार्थ्यांना कौशल्य प्रदान करून समाजासाठी मोठे योगदान दिले आहे, असे गौरवोद्गारही त्यांनी यावेळी काढले.
दरम्यान नुकत्याच झालेल्या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून या कार्यक्रमात विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात महिला घराच्या मर्यादा ओलांडून स्वतःच्या आणि समाजाच्या विकासासाठी काम करत आहेत, याचा सार्थ अभिमान असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांच्या हस्ते सिंधुमित्र प्रतिष्ठानच्या संचालिका डॉ. मुग्धा ठाकरे, तुळस मतदार संघाच्या जिल्हा परिषद सदस्या सौ. सुजाता पडवळ, युवा उद्योजिका ऐश्वर्या शेठ कोरगांवकर यांच्यावतीने माजी उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगांवकर यांचा गौरव करण्यात आला. तसेच अल्पावधीत राज्य व राष्ट्रीय स्तरावर नैपुण्य मिळविलेला सावंतवाडीचा बाल धावपटू कु. कबीर नवीद हेरेकर याचाही विशेष सन्मान झाला. याशिवाय केंद्रातील उत्कृष्ट कार्यकर्त्या कविता नाईक, सुखदा नाईक, मिताली केदार आणि ब्रँड अँबॅसेडर अनुष्का वर्दम यांचाही सत्कार करण्यात आला.

अटल प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. नकुल पार्सेकर यांनी आपल्या मनोगतात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या कार्याचे कौतुक केले. मागील सहा महिन्यांत जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जिल्ह्यात होत असलेल्या विकासात्मक कामांचा जिल्ह्याचा सजग नागरिक म्हणून सार्थ अभिमान असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी उमेश गाळवणकर, प्राचार्य कैलास राबते आणि भूपतसेन सावंत यांनीही आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला एसएसआय कॉम्प्युटरचे चेअरमन रघुनाथ तानावडे व डॉ. सौ. गौरी तानावडे यांनी मान्यवरांचे स्वागत केले, तर रघुनाथ तानावडे यांनी प्रास्ताविकातून संस्थेची वाटचाल विशद केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. रुपेश पाटील यांनी केले. या सोहळ्याला विद्यार्थी, पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



