जिल्ह्यात आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आदर्शवत ग्रंथालय निर्माण करणार
सावंतवाडी,दि.२१ : कोकण साहित्यिकांची भूमी आहे. अनेक साहित्यिक या भूमीने या राज्याला व देशाला दिले आहेत. त्यामुळेच पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी कोकणातील साहित्य व साहित्यिक यांना एक हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी कोकण मराठी साहित्य परिषदेची स्थापना केली. कोकणातील या अमूल्य साहित्य संपदेचे जतन करण्याची जबाबदारी ही शासनाचा प्रतिनिधी म्हणून माझी आहे. साहित्याचा ठेवा असणाऱ्या जिल्ह्यातील सर्व ग्रंथालयांमध्ये येणाऱ्या वर्षभरात अमुलाग्र बदल करण्यात येणार असून काळानुरूप त्यांचे आधुनिकीकरण देखील करण्यात येणार आहे. मोबाईलच्या अधीन झालेली व पुस्तकांपासून व साहित्यापासून दूर जात असलेली नवी पिढी पुन्हा एकदा ग्रंथालयाकडे वळवण्यासाठीदेखील आपण पुढाकार घेतला असून त्यासाठी डिजिटल ग्रंथालय ही संकल्पना आपण पुढे आणत आहे. त्या दृष्टीने आपण आराखडा व नियोजन केलेले असून संबंधित मंत्र्यांशी बोलून त्यासाठी लागणाऱ्या परवानग्या व आवश्यक निधी आपण लवकरच उपलब्ध करणार आहे. त्यामुळे आगामी वर्षभरात जिल्ह्यातील ग्रंथालयांची परिस्थिती निश्चितच बदललेली दिसेल, अशी ग्वाही कोकण मराठी साहित्य परिषद आयोजित जिल्हास्तरीय साहित्य संमेलनाचे उद्घाटक राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी दिली.
दरम्यान, साहित्याचे जतन करण्याच्या या प्रक्रियेत जिल्ह्यातील साहित्यिकांनी सातत्याने संपर्कात राहून संवाद साधायला हवा. सूचना व मार्गदर्शन करायला हवं. आपण सर्वांनी एकत्र येऊन कोकणातील साहित्याचा हा ठेवा जतन करण्याची आपली सामूहिक जबाबदारी आहे, असे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज साहित्य नगरी सावंतवाडीतील बॅरिस्टर नाथ पै सभागृहाच्या विद्याधर भागवत व्यासपीठावर आयोजित कोमसाप शाखा सावंतवाडी संयोजित कोकण मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्ग जिल्हा साहित्य संमेलन २०२५ चे उद्घाटन ना. नितेश राणे यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाले. यावेळी कोमसापच्यावतीने पालकमंत्र्यांना मानपत्र अर्पण करून त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी कोकणातील ग्रंथालय व साहित्यिक चळवळीचे जतन करण्याची गरज विशद केली.
यावेळी व्यासपीठावर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक व नाटककार गंगाराम गवाणकर, कोमसाप अध्यक्षा नमिता कीर, कार्याध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ, कोमासापचे जिल्हाध्यक्ष मंगेश म्हस्के, जेष्ठ कवयित्री उषा परब, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हाधिकारी अनिल पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, नगर परिषदेचे मुख्य अधिकारी परितोष कंकाळ, प्रांताधिकारी हेमंत निकम, तहसीलदार श्रीधर पाटील, सावंतवाडी तालुकाध्यक्ष ॲड. संतोष सावंत, डॉ. मिलिंद कुलकर्णी, शेखर सामंत, वृंदा कांबळी, ॲड. नकुल पार्सेकर, रुजारिओ पिंटो यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
ते म्हणाले, साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आमचे मार्गदर्शक व ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधुभाईंचा आशीर्वाद घेता येईल असे वाटले होते मात्र काही कारणास्तव ते उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र माझ्या या वाटचालीत त्यांचा आशीर्वाद मला निश्चितच आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी कोकण मराठी साहित्य परिषद व कोकणाने फार मोठे योगदान दिले आहे. गंगाराम गव्हाणकर तसेच मालवणी नटसम्राट मच्छिंद्र कांबळी यांनी आपली मालवणी मायबोली साता समुद्रा पार नेली. याच मालवणी भाषेचे सुद्धा जतन करणे हे आमचे कर्तव्य असून त्या दृष्टीने लवकरच कोकणात मालवणी भाषा भवन उभारण्याचा माझा मानस आहे. त्या दृष्टीने माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे आमचे सहकारी आमदार माजी मंत्री दीपक केसरकर तसेच आमदार निलेश राणे यांच्यासह जिल्हाधिकारी व अन्य प्रशासनाच्या मदतीने त्या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याची ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली.
संमेलनाच्या माध्यमातून आपलं कोकण व कोकणातील साहित्य सर्व दूर नेण्याचे काम केलं जातं. त्यादृष्टीने कोकणातील असलेल्या साहित्याचे जतन व्हावे तसेच नवनवीन साहित्यिक निर्माण व्हावेत यासाठी आपणा सर्वांची एकत्रित जबाबदारी असून पालकमंत्री म्हणून मी घेतलेल्या पुढाकारासाठी आपणा सर्वांचे मार्गदर्शन व संवाद आवश्यक आहे. हा ठेवा जतन व्हावा यासाठी तुमच्या मार्गदर्शनाचा निश्चितच विचार केला जाईल व त्या दृष्टीने पाऊले उचलली जातील असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.
मी कणकवलीतील ग्रंथालयाचा अध्यक्ष आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रंथालयांची आजची दयनीय परिस्थिती मला चांगली ज्ञात आहे. ग्रंथालयांच्या इमारती अतिशय जीर्ण झालेल्या आहेत. साहित्याचे स्टॉलवर साहित्यिकांशी बोलत असताना काही जुने साहित्य यापुढे कसं जतन केलं जाईल असा सवाल उपस्थित करण्यात आला. आज वाचक साहित्यापासून दूर जात आहे. मोबाईलच्या इंटरनेटच्या अधीन झालेली नवी पिढी साहित्यापासून लांब होत आहे. या पिढीला पुन्हा एकदा ग्रंथालयांपर्यंत आणण्यासाठी त्यांचे आधुनिकीकरण व डिजिटल तंत्रज्ञान विकसित करणे ही काळाची गरज आहे. त्या दृष्टीने देखील आपले प्रयत्न सुरू असून लवकरच त्याची मुहूर्तमेढ रोवली जाईल अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली.
पुढील वर्षीचे साहित्य संमेलन होण्यापूर्वी ग्रंथालयांची परिस्थिती निश्चितच बदलायची आहे. हाच विश्वास देण्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे. साहित्य संमेलनाचा उद्घाटक म्हणून मला निमंत्रित करण्यात आले तर काही जणांकडून मी या ठिकाणी कसा योग्य नाही त्याची देखील चर्चा झाली. मी आज या देशात व राज्यात विचारांची लढाई लढत आहे. मी आमदार व मंत्री असलो तरीही मी प्रथम हिंदू आहे व ती माझी भूमिका स्पष्ट आहे. मात्र असे असले तरीही या जिल्ह्याचा पालकमंत्री अर्थात सरकारचा प्रतिनिधी म्हणून या जिल्ह्यातील साहित्य चळवळ वृद्धिंगत होण्यासाठी माझे जास्तीत जास्त प्रयत्न राहतील व पुढील वर्षी येणाऱ्या साहित्य संमेलनाच्या पूर्वी या जिल्ह्यातील साहित्यसंपदा असलेल्या ग्रंथालयांमध्ये निश्चितच आमुलाग्र बदल झालेले दिसतील असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.
साहित्य संमेलनामध्ये नव्या पिढीचा देखील समावेश असायला हवा. अशा कार्यक्रमांपासून दूर जात असलेली नवी पिढी पुन्हा एकदा या कार्यक्रमांकडे कशी आकृष्ट होईल यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. अशा कार्यक्रमांना केवळ गर्दी असून चालणार नाही तर त्यासाठी दर्दी आवश्यक आहेत त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायला हवेत. तुमचे विचार व मार्गदर्शन त्यासाठी आवश्यक आहे. मी केवळ ऐकून घेणाऱ्यापैकी नाही तर करून घेणाऱ्यांपैकी आहे. नाही हा शब्द माझ्या डिक्शनरीत नाही. त्यामुळे साहित्यिकांनी या दृष्टीने आपल्या सूचना व मार्गदर्शन निश्चितच करावे त्यांना मूर्त रूप देण्यासाठी मी सदैव तत्पर आहे असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने संमेलनाचे उद्घाटक ना. नितेश राणे यांना मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. त्या मानपत्राचे वाचन ॲड. नकुल पार्सेकर यांनी केले. तर संमेलनाचे अध्यक्ष नाटककार गंगाराम गवाणकर यांना देखील पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या हस्ते मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांच्या मानपत्राचे वाचन जेष्ठ कवी दीपक पटेकर यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविकात कोमसापचे जिल्हाध्यक्ष मंगेश म्हस्के यांनी कोमसापचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांना महाराष्ट्र शासनाकडून महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात यावा असे आवाहन केले. तसेच कोकणातील साहित्य संस्कृतीचा ठेवा जतन करण्यासाठी देखील शासनाकडून सहकार्य मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी विठ्ठल कदम तसेच भरत गावडे यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाराष्ट्र गौरव गीत तसेच ग्रंथ गौरव गीत सादर करण्यात आले. तर आभार सावंतवाडी तालुका अध्यक्ष ॲड. संतोष सावंत यांनी मानले.