चिमुकल्यांनी आवारातील झाडांना बांधल्या बियांच्या राख्या; ‘वृक्ष रक्षणा’ची घेतली शपथ
सावंतवाडी,दि.३०: रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून तळवडे येथील ‘इंग्लिश मिडियम स्कूल’मध्ये पर्यावरणपूरक ‘इको-फ्रेंडली राखी मेकिंग’ उपक्रम अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला. सणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये निसर्ग आणि पर्यावरणाविषयी आपुलकी निर्माण व्हावी, या उद्देशाने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या उपक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी प्लास्टिक आणि कृत्रिम साहित्याचा पूर्णपणे त्याग करत निसर्गाशी नातं जोडणाऱ्या राख्या तयार केल्या. झाडांची पाने, रंगीबेरंगी फुले, बिया आणि कापूस यांसारख्या पूर्णपणे नैसर्गिक घटकांचा वापर करून विद्यार्थ्यांनी अत्यंत आकर्षक राख्या बनवल्या. विशेष म्हणजे, या राख्यांमध्ये वापरण्यात आलेल्या बिया रक्षाबंधनानंतर मातीत लावल्यास त्यातून नवीन रोपटे जन्माला येणार असल्याने, या उपक्रमातून पुनर्वापराचा आणि वृक्षरोपणाचा मोलाचा संदेश देण्यात आला.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात अत्यंत भावुक आणि हृदयस्पर्शी सोहळा पाहायला मिळाला. शाळेच्या प्री-प्रायमरी आणि प्रायमरी विभागातील लहानग्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या आवारात असलेल्या झाडांना स्वतःच्या हाताने बनवलेल्या राख्या बांधून ‘वृक्ष बंधन’ साजरे केले. “झाडे वर्षानुवर्षे आपले रक्षण करतात, आता आम्हीही या झाडांचे कायम रक्षण करू,” अशी नितांत सुंदर शपथ चिमुकल्यांनी या वेळी घेतली.
विद्यार्थ्यांच्या या उपक्रमामुळे लहान वयातच त्यांच्यावर पर्यावरण रक्षणाचे संस्कार रुजण्यास मदत झाली आहे. शालेय स्तरावर राबवण्यात आलेल्या या नाविन्यपूर्ण आणि संदेशात्मक उपक्रमाचे सर्वच स्तरातून आणि पालकांमधून भरभरून कौतुक होत आहे.



