Home News १ लाख ५६ हजार अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांनी घेतले मराठीचे धडे

१ लाख ५६ हजार अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांनी घेतले मराठीचे धडे

0
2

कोकण मराठी साहित्य परिषदेचा ऐतिहासिक उपक्रम; ३६ जिल्ह्यांत १६०० कार्यकर्ते कार्यरत

कुडाळ,दि.३०: महाराष्ट्रात व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला येथील भाषा आणि संस्कृतीची ओळख असणे आवश्यक आहे, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाच्या पुढाकारातून राबविण्यात आलेल्या अमराठी रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकविण्याच्या उपक्रमात १ लाख ५६ हजार चालकांनी मराठीचे धडे घेतले आहेत. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या (कोमसाप) माध्यमातून हा ऐतिहासिक उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला असून, कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात उत्तीर्ण चालकांची प्रमाणपत्रे प्रादेशिक परिवहन विभागाच्या (आरटीओ) अधिकाऱ्यांकडे सुपूर्त करण्यात आली.

महाराष्ट्रात वाहन चालविण्याचे परमिट घेणाऱ्या अमराठी चालकांना मराठी बोलता येणे बंधनकारक असल्याचा शासन निर्णय १९८९ मध्येच घेण्यात आला होता. मात्र, गेल्या ३६ वर्षांत या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी झाली नव्हती. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या आर्थिक व संस्थात्मक पाठबळामुळे या उपक्रमाला मूर्त स्वरूप मिळाले. ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा अभियान’ अंतर्गत १ मे रोजी सुरू झालेल्या या अभियानाची १५ ऑगस्ट रोजी सांगता झाली. या मोहिमेची मुख्य जबाबदारी कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघ या संस्थांवर सोपविण्यात आली होती.

राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये कोमसापचे सुमारे १६०० साहित्यिक, प्राध्यापक व कार्यकर्ते या कार्यात सहभागी झाले होते. अवघड अभ्यासक्रमाऐवजी दैनंदिन व्यवहारात उपयोगी पडणारी वाक्ये शिकविण्यावर यात भर देण्यात आला. दररोज चार वाक्ये याप्रमाणे सराव करून घेत चालकांचा मराठी बोलण्याचा न्यूनगंड दूर करण्यात आला. रिक्षा, टॅक्सीसह ओला, उबेर आणि रॅपिडोच्या अमराठी चालकांनीही यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. प्रशिक्षणानंतर कोमसापचे प्रशिक्षक आणि आरटीओ अधिकाऱ्यांनी घेतलेल्या तोंडी परीक्षेत उत्तीर्ण चालकांना प्रमाणपत्रे देण्यात आली. या परीक्षेत ७ हजार ७५० चालक अपयशी ठरले असले, तरी त्यांनी पुन्हा परीक्षा देण्याची तयारी दर्शवली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुदतवाढ दिल्याने आणखी चालक स्वतःहून पुढे येत आहेत.

ठाणे येथे १७ ऑगस्ट रोजी झालेल्या मुख्य कार्यक्रमासह राज्यातील सुमारे ५० आरटीओ कार्यालयांमध्ये प्रमाणपत्र वितरण पार पडले. कुडाळ येथील कार्यक्रमात कोमसापचे कार्याध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ आणि आरटीओ अधिकारी श्री. माने यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन विशेष गौरव करण्यात आला. नियम केवळ कागदावर न ठेवता मानवतेच्या दृष्टिकोनातून भाषा शिकवून मराठीचा जागर करण्याची संधी या उपक्रमातून मिळाल्याची भावना डॉ. ढवळ यांनी व्यक्त केली, तर आरटीओ अधिकारी माने यांनी अशा उपक्रमांना नेहमीच सहकार्य राहील अशी ग्वाही दिली.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. संतोष सावंत यांनी केले, तर प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के यांनी मांडले. कार्यक्रमास अनंत वैद्य, सुरेश पवार, रुजारिओ पिंटो, संदीप वालावलकर, निलेश जोशी, अभिमन्यू लोंढे, दिपाली काजरेकर, वृंदा कांबळी, प्रा. संतोष वालावलकर, दीपक पटेकर, वर्षा वैद्य व दत्तात्रेय उर्फ बाळ पुराणिक यांसह इतर मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here