Home News बाबासाहेब म्हणजे विकारांच्या दऱ्या बुजवून विचारांचे वटवृक्ष निर्माण करणारे युगपुरुष: प्रा. रूपेश...

बाबासाहेब म्हणजे विकारांच्या दऱ्या बुजवून विचारांचे वटवृक्ष निर्माण करणारे युगपुरुष: प्रा. रूपेश पाटील

0
1

गोवा येथे महामानवांच्या संयुक्त जयंतीनिमित्त व्याख्यान संपन्न; कोकण रेल्वे कर्मचारी संघटनेचा पुढाकार

सावंतवाडी,दि.१६: “डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे केवळ एक नाव नसून ते एक जैविक बुद्धिवंत होते, जे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न न्यायिक पद्धतीने सोडविण्यासाठी आयुष्यभर झटले. बाबासाहेब म्हणजे मूर्तीमंत बंड होते, ज्यांच्या देहातील कणाकणातून अन्यायाविरुद्धचे बंड थैमान घालत होते. जुलमी व अत्याचारी व्यवस्थेविरुद्ध उगारलेली वज्रमूठ आणि जातीयता व विषमतेवर प्रहार करणारे चक्र म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर होत. खऱ्या अर्थाने समाजातील विकारांच्या दऱ्या बुजवून विचारांचे वटवृक्ष निर्माण करणारे ते युगपुरुष आणि आधुनिक भारताचे राष्ट्रनिर्माते आहेत,” असे प्रतिपादन सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. रूपेश पाटील यांनी वेरणा (गोवा) येथे केले.

वेरणा येथील कोकण रेल्वेच्या अखिल भारतीय एस.सी., एस.टी. कर्मचारी संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या संयुक्त जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख व्याख्याते म्हणून प्रा. पाटील बोलत होते. यावेळी व्यासपीठावर डीईई शुभम सिन्हा, वरिष्ठ डीओएम इनायत हुसेन, सुप्रसिद्ध शिल्पकार तथा उपक्रमशील शिक्षक हंसराज गवळे, संयुक्त जयंती समितीचे अध्यक्ष प्रशांत जाधव, सचिव दीपक जाधव, सुरज कांबळे आदि मान्यवर उपस्थित होते.

आपल्या व्याख्यानात पुढे बोलताना प्रा. रूपेश पाटील म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे बुद्धिमत्तेचे विलक्षण तेज असतानाही त्यांच्याकडे नम्रता, स्वाभिमान व प्रामाणिकता यांचा त्रिवेणी संगम होता. ते एक सर्जनशील समाजक्रांतीकारक होते, ज्यांनी काळाराम मंदिर आणि अमरावती येथील अंबादेवी मंदिर सत्याग्रहाच्या माध्यमातून अस्पृश्यांना न्याय मिळवून दिला. बाबासाहेबांनी मन्वंतर घडविणारी पत्रकारिता करत ‘बहिष्कृत भारत’, ‘मूकनायक’ आणि ‘जनता’ या मुखपत्रांतून शोषितांचे प्रश्न मांडले. विशेषतः कर्मचारी बांधवांसाठी कायदामंत्री असताना त्यांनी कामाचे स्वरूप आणि वेतनाचे धोरण निश्चित करून मोठे योगदान दिले. ज्या समाजाला धर्ममार्तंडांनी पिढ्यानपिढ्या बहिष्कृत केले होते, त्यांना संविधानाद्वारे माणूस म्हणून जगण्याचा हक्क बाबासाहेबांनी मिळवून दिला.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमा पूजनाने झाली. जयंती समितीच्या वतीने उपस्थित पाहुण्यांचे स्वागत वृक्षाचे रोप, गुलाबपुष्प आणि बाबासाहेबांचे ग्रंथ देऊन करण्यात आले. यावेळी शुभम सिन्हा, इनायत हुसेन, हंसराज गवळे आणि अध्यक्ष प्रशांत जाधव यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या विशेष सोहळ्यात शिल्पकला, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे शिक्षक हंसराज गवळे यांचा समितीच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. या संपूर्ण कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन विशाल जाधव यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here