सावंतवाडी,दि.३१: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघ आदर्श व क्रमांक एकवर नेण्याचा संकल्प महायुतीचे उमेदवार तथा भारतीय जनता पार्टीचे युवा नेते संदीप गावडे यांनी व्यक्त केला आहे. तळवडे मतदारसंघातून ते महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून, आज तळवडे येथील श्री देव भूतनाथ मंदिरात श्रीफळ वाढवून व देवदर्शन घेऊन त्यांनी आपल्या प्रचाराचा शानदार शुभारंभ केला. यावेळी मंदिरात पारंपरिक पद्धतीने गाऱ्हाणं घालून विजयासाठी साकडं घालण्यात आले. याप्रसंगी महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्थानिक ग्रामस्थ व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना संदीप गावडे म्हणाले की, माझे सध्याचे प्रतिस्पर्धी आणि मी एकाच वेळी पंचायत समिती सदस्य म्हणून राजकारणात पदार्पण केले होते. मात्र, त्यानंतरच्या काळात मी केवळ एका क्षेत्रापुरता मर्यादित न राहता सावंतवाडी, वेंगुर्ला आणि दोडामार्ग या तिन्ही तालुक्यांत सातत्याने विविध विकासात्मक उपक्रम राबविले आहेत. विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप करणे, शाळांमध्ये भौतिक सुविधा उपलब्ध करून देणे तसेच सोलर पॅनेलच्या माध्यमातून शाळांना अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी आपण प्रामाणिकपणे काम केले आहे. त्यामुळे माझ्या प्रतिस्पर्धी उमेदवारांनी गेल्या काळात नेमके कोणते विधायक उपक्रम राबविले, याची तुलना आता जनतेनेच करावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
दरम्यान, तिकीट न मिळाल्यामुळे ज्येष्ठ नेते प्रमोद गावडे नाराज असल्याच्या चर्चेवर बोलताना संदीप गावडे यांनी स्पष्ट केले की, मी स्वतः प्रमोद गावडे यांची भेट घेतली असून, त्यांची माझ्याबाबत कोणतीही नाराजी नाही. त्यांचे आशीर्वाद मला लाभले असून, लवकरच ते निवडणुकीच्या मुख्य प्रवाहात येऊन महायुतीला साथ देतील, अशी खात्री त्यांनी व्यक्त केली. तसेच आगामी काळात मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगताना त्यांनी स्पष्ट केले की, सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचा प्रश्न आणि काजू उद्योजकांचे मुद्दे मार्गी लावण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे, खासदार नारायण राणे, आमदार दीपक केसरकर, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने काम केले जाईल. सर्व देवदेवतांच्या आशीर्वादाने प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचून तळवडे मतदारसंघाला जिल्ह्यात क्रमांक एकवर नेण्याचा आपला ठाम मानस असल्याचे त्यांनी शेवटी आवर्जून नमूद केले.




