Home ठळक घडामोडी ए.आय अन् डिजिटल क्रांतीच्या युगात विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने यश संपादन करावे: पद्मश्री परशुराम...

ए.आय अन् डिजिटल क्रांतीच्या युगात विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने यश संपादन करावे: पद्मश्री परशुराम गंगावणे

0
2

सावंतवाडीत कोकण कला संस्था व वेताळ प्रतिष्ठानतर्फे गुणवंत विद्यार्थी आणि शिक्षक सन्मान सोहळा उत्साहात; ३०० हून अधिक विद्यार्थ्यांचा गौरव

सावंतवाडी,दि.०१ : सध्याचे युग हे डिजिटल क्रांती आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चे आहे. विद्यार्थ्यांनी मोबाईलमधील चांगल्या गोष्टींचा स्वीकार करून स्वतःमध्ये प्रचंड आत्मविश्वास निर्माण करायला हवा. मुलांनी स्वप्न पाहावीत आणि ती पूर्ण करण्यासाठी कष्ट व सातत्य ठेवल्यास सिंधुदुर्गातील विद्यार्थी नक्कीच जिल्ह्याचा गौरव वाढवतील आणि स्पर्धा परीक्षेत उज्ज्वल भविष्य घडवतील, असा विश्वास पद्मश्री परशुराम गंगावणे यांनी व्यक्त केला. कोकण कला व शिक्षण विकास संस्था आणि वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग (तुळस) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गुणवंत विद्यार्थी गुणगौरव व शिक्षक सन्मान सोहळ्यात ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते.

कार्यक्रमात बोलताना सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील यांनी विद्यार्थ्यांनी आपला शैक्षणिक पाया भक्कम करण्याचे आणि शाळांमधील विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन अष्टपैलू बनण्याचे आवाहन केले. करिअरच्या अनेक संधी उपलब्ध असल्याने विद्यार्थ्यांनी आपले क्षेत्र निश्चित करून अवांतर वाचनाची सवय ठेवावी, ज्यामुळे स्पर्धा परीक्षांमध्ये मोठा फायदा होईल, असे ते म्हणाले. संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल यांनी सिंधुदुर्गातील मुले जगात नाव निर्माण करतील असा विश्वास व्यक्त करत, विद्यार्थ्यांना प्रशासकीय सेवेत पाठवण्यासाठी पालकांनी मानसिकता तयार करावी, संस्था त्यांना निश्चित सहकार्य करेल अशी ग्वाही दिली.

पोलीस उपनिरीक्षक माधुरी मुळीक यांनी सिंधुदुर्ग साक्षर असूनही स्पर्धा परीक्षांमध्ये अधिकाधिक मुलांनी उतरण्याची गरज प्रतिपादन केली. तसेच वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर पालक आणि विद्यार्थ्यांनी डिजिटल सुरक्षेबाबत साक्षर राहून सतर्क राहण्याचा सल्ला दिला. विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अश्विनी लेले यांनी पालकांनी मुलांची क्षमता ओळखून त्यांच्या स्वप्नांना प्राधान्य दिले पाहिजे असे मत व्यक्त केले, तर सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. रूपेश पाटील यांनी दयानंद कुबल यांच्या नेतृत्वात सुरू असलेले शैक्षणिक, आरोग्य व सामाजिक कार्य संपूर्ण महाराष्ट्रासाठी आदर्श आणि प्रेरणादायी असल्याचे सांगून संस्थेच्या कार्याचा गौरव केला.

दरम्यान, या सोहळ्यात तब्बल ३०० पेक्षा अधिक गुणवंत विद्यार्थ्यांना भेटवस्तू व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले, तसेच १०० टक्के निकाल लावणाऱ्या शाळांच्या मुख्याध्यापकांचाही विशेष गौरव झाला. या सोहळ्याला सैनिक पतसंस्थेचे महाव्यवस्थापक सुनील राऊळ, स्टेपिंग ग्लोबल स्कूलचे संचालक अँड. रूजूल पाटणकर, ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, पत्रकार आनंद धोंड, माहिती अधिकार महासंघाचे तालुकाध्यक्ष सुशील चौगुले, प्रा.डी. एस. जांभेकर

सामाजिक कार्यकर्ते प्रसन्न उर्फ बाळू देसाई, मानसी परब, यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. शिर्के यांनी केले, सूत्रसंचालन प्रा. सचिन परुळेकर यांनी बहारदार पद्धतीने केले, तर प्रथमेश सावंत यांनी उपस्थितांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here